परभणी : ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने गावभर सभा, कॉर्नर सभा व प्रत्येकाची भेटीगाठ होणार आहे. त्यामुळे या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांनी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दररोेज रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नामनिर्देशन केंद्रावर किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील उपलब्ध वैद्यकीय पथकाकडून आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले आहे.