पाण्याअभावी वाळू लागली झाडे
परभणी : जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड केलेल्या झाडांना पाण्याची सुविधा नसल्याने ही झाडे वाळत आहेत. प्रशासनाने मोठ्या उत्साहात झाडे लावली. त्यानंतर भूजल पातळी वाढलेली असल्याने या झाडांना पाणी मिळाले; परंतु आता भूजल पातळी घटत असून झाडे वाळू लागली आहेत.
सवारी रेल्वेगाड्यांची प्रवाशांकडून मागणी
परभणी : रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सद्य:स्थितीला एक्स्प्रेस रेल्वे गाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पार्किंगसाठी मुख्य रस्ताच बंद
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर तात्पुरती पार्किंगसेवा सुरू करण्यात आली आहे. ही पार्किंग मुख्य प्रवेशद्वारासमोरच करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे वाहने आत जाऊ नयेत म्हणून बॅरिकेटस् लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात प्रवास करताना अडथळे पार करावे लागत आहेत.
सिग्नल यंत्रणा अनेक वर्षांपासून ठप्प
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा नियोजनाअभावी ठप्प पडली आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा होतो. ठिकठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा उपयोगात येऊ शकते. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही यंत्रणा धूळखात पडून आहे.
कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. अनेक भागांत हा कालवा उखडला असून गाळही मोठ्या प्रमाणात साचला आहे. यावर्षी जायकवाडी प्रकल्पातून तीन पाणी आवर्तने देण्यात आली. मात्र, कालवा खराब झाल्याने हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
गव्हाच्या काढणीला जिल्ह्यात वेग
परभणी : रबी हंगामातील गव्हाचे पीक काढणीला आले असून अनेक भागांत गहू काढणीला वेग आला आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने गहू काढणी सुरू केला आहे. मळणी यंत्राच्या साहाय्याने काढणी होत आहे.
गंगाखेड रस्त्याच्या कामाला गती
परभणी : गंगाखेड- परभणी या महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सध्या शहराच्या हद्दीत कामाला गती देण्यात आली आहे. गंगाखेड नाका ते परभणी शहर या परिसरात रस्त्याचे एकेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी आशा आहे.
परभणी शहरातील बसस्थानक गैरसोयीचे
परभणी : शहरातील बसस्थानक प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. जिल्हाभरातून या स्थानकावरून प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा महामंडळाने उपलब्ध करून दिली नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे सोमवारपासून बससेवा बंद करण्यात आली आहे. तेव्हा या काळात एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, अशा स्वरूपाचे बसस्थानक उभारावे. तसेच शहरी आणि ग्रामीण प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.