ताडबोरगाव येथून दुचाकी लंपास
मानवत : तालुक्यातील ताडबोरगाव येथून अज्ञात चोरट्यांनी संग्राम माणिकराव भिसे यांची (एम.एच.२२-८४९५) दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ मार्चच्या रात्री घडली. भिसे हे रस्त्यात दुचाकी बंद पडल्याने परभणी- ताडबोरगाव रस्त्याच्या शिवारात रस्त्याच्या कडेला उभी करून गेले होते. नंतर ती चोरीस गेली.
खंडाळी गाव आठ दिवसांपासून अंधारात
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील वीज पुरवठा आठ दिवसांपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीच्या नावाखाली खंडित केला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामस्थांनी ३० टक्के थकबाकी भरल्यास पुरवठा सुरू केला जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाजंत्री कलाकारांची गैरसोय
देवगावफाटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी बुक केलेले वाजंत्री कलाकारांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
एस.टी.बसमध्ये धोकादायक गर्दी
देवगावफाटा : सेलू तालुक्यातून ये-जा करणाऱ्या एस.टी. बसमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर प्रवासी अस्वस्थ आहेत.
मानधन मिळत नसल्याने नाराजी
देवगावफाटा : लोककला सादर करुन उपजिविका भागविणाऱ्या लोककलावंतांना कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून शासनाचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे या कालावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने मानधन द्यावे, अशी मागणी या कलावंतांमधून होत आहे.
पोस्टमनची दुचाकी चोरीस
पाथरी : येथील पोस्टमन कान्होबा मुकूंद मनेरे यांची एम.एच.२२- एम.८८७४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी १८ मार्च रोजी दुपारी २वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावरुन चोरुन नेली. याबाबत त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुलेट चालकांवर कारवाईची मागणी
परभणी : सायलन्सरमध्ये छेडछाड करून मोठ्या आवाजाने बुलेट चालविणाऱ्यांची संख्या शहरात वाढली आहे. अशा बुलेट चालकांमुळे इतर नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
परभणी : शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. भारत संचार निगम लि.च्या कार्यालयापासून शिवाजीनगरकडे जाणारा हा रस्ता दोन वर्षांपूर्वीच मनपाने तयार केला होता. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.