यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने पूर्णा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपी अमोर नागनाथ सिरसाट आणि अमोल विद्याधर सुरडकर या दोघांनी पीडित मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. परभणी येथील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्या न्यायालयासमोर २० मार्च रोजी सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मयूर साळापूरकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या. पठाण यांनी दोन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे साधी कैद व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. मनाळे तर कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून पी. एस. राठोड, वंदना साळवे, सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
विनयभंग प्रकरणी दोघांना साधी कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:17 AM