कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फटका हॉटेल्स व ढाबा चालकांना बसला. अनेकांचा रोजगार हिरवल्या गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हॉटेल आणि ढाबेचालकांनाही आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. अनलॉकनंतर हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाली नव्हती. सद्यस्थितीत हा व्यवसाय सुरक्षित अंतर ठेऊन सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापही मिळाला नाही. युवावर्ग नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल आणि ढाब्याची निवड करतात. दोन दिवसांवर आलेल्या थर्टी फर्स्टमुळे हॉटेल व्यवसायाला नवी संजीवनी मिळणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पार्टीचे नियोजन होणार असल्याचे चित्र सध्या आहे. या सर्व पार्ट्या हॉटेल, ढाब्यावर होणार असल्याने हॉटेल व्यवसायासाठीही पर्वणीच ठरणार आहे. मात्र राज्य सरकारने रात्री दहानंतर संचारबंदी लागू केली असल्याने या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होतो. तसेच या बाबतीत पोलीस काय भूमिका घेतात, यावर हॉटेल व्यवसायिक व ढाबे चालकांचे गणित अवलंबून असणार आहे.
ढाबे, हाॅटेलवर गर्दी
शहर व परिसरात ३० ते ३५ फॅमिली रेस्टॉरंट, ढाबे आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यवसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुका असल्याने आठवडाभरापासून ढाब्यांवर गर्दी होत आहे.
थर्टी फर्स्ट तोंडावर आल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे. सजावट, विद्युत रोषणाई आदी कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. कोरोनाचे संकट विसरून आता चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
-ओमप्रसाद दहिने, हॉटेल व्यवसायिक, मानवत
प्रशासनाने लागू केलेल्या अटी व शर्थींचे पालन हॉटेल व्यवसायिकांनी करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी व्यवसायिकांना घ्यावी लागेल.
- रमेश स्वामी, पोलीस निरिक्षक, मानवत