Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक संकल्प करायचे तर आहेत पण अधिक वेळ नाही? 'हे' सोपे व्रताचरण तुमच्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:41 PM2023-07-18T15:41:33+5:302023-07-18T15:45:55+5:30

Adhik Maas 2023: अधिक मास हा अधिक पुण्यसंचयाची पर्वणी असते, हे आपण जाणतो. यंदा अधिक श्रावण मास आल्यामुळे आपणही सत्कर्म करावे आणि पुण्यसंचय करावे असे सर्वांना वाटते. पण संकल्प करावा म्हटले की तो सिद्धीस नेईपर्यंत अनेक अडचणी येतात. त्यात मुख्य अडचण असते ती वेळेची. वेळेचे गणित जुळवून कोणते संकल्प करता येतील आणि त्यांची पूर्तता करता येईल याबद्दल मार्गदर्शन करत आहेत ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित.

५ शुक्रवार / मंगळवार देवीची ओटी ( पहिल्या ४ घरातील देवघरातील देवीच्या आणि पाचवी जवळच्या मंदिरात जाऊन भरायची ) श्रीफळ, साधा टॉवेल घ्या (आता खण कुणी वापरत नाही) तांदूळ , वेणी गजरा , हळद कुंकू , साखर गुळ , डाळिंब ( देवीला आवडते) किंवा कुठलेही फळ घ्या. एका ताटात ठेवुन त्याला हळद कुंकू लावा आणि देवीला गाऱ्हाणे घाला नतमस्तक व्हा. धूप निरांजन नेवैद्य जसे जमेल तसे करा. दुसऱ्या दिवशी हे सर्व घरात वापरायचे पाचवी ओटी देवळात जाऊन भरायची आणि तिथेच अर्पण करायची. श्री सुक्त पठन , देवी महात्म इत्यादी स्तोत्र म्हणून किंवा श्रवण करून कुलदेवीची उपासना करता येईल.

पुरुषोत्तम मास असल्याने एक वेळ ठरवून जप माळ ओढणे शक्य नसेल तर, आठवण झाली की लगेच विष्णूचा जप – ओं नमो भागवते वासुदेवाय / ओं विष्णवे नमः हा जप मनातल्या मनात सुरू करायचा. त्यात सातत्य आणण्याचा प्रयत्न करायचा.

विष्णू सहस्त्रनाम : पुरुषोत्तम मासात विष्णू महत्त्म्य कानावर पडावे, म्हणून हे स्तोत्र ऐकले किंवा म्हटले जाते. तुम्हाला हे स्तोत्र पाठ नसेल तर इंटरनेटवर ते ऐकण्यासाठी सहज उपलब्ध आहे. रोज सकाळी ते लावल्यास घरच्या सर्व मंडळींच्या कानावर ते पडेल आणि त्यांनाही स्तोत्र श्रावणाचा लाभ मिळेल.

स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरुंचा जप करा. जपासाठी माळ नाही घेतली तर उत्तम जप श्वासागणिक करावा. जप हा गुरूंबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा आणि आपल्या जीवनाचा आधार वाट्याचा मार्ग आहे. काहीतरी मिळवण्यासाठी जप नको.

श्री गजानन विजय ग्रंथ , साई चरित्र , गुरूलीलामृत अश्या धार्मिक ग्रंथांचे नित्य पठणही करता येईल. महादेवाला अभिषेक, लघुरुद्र, श्री सत्यनारायण पूजा यांचे आयोजन करता येईल.

अशा अनेक उपासना पुढील दोन महिन्यात करता येण्यासारख्या आहेत . ज्याला जसे जमेल तसे करावे, पण करावे हे महत्वाचे आहे .आपल्या प्रपंचाची घडी नीट बसेल , संकटातून मार्ग सापडतील. मन शांत होयील , ईश्वरचरणी चित्त एकाग्र होयील . अध्यात्म हा जीवनाचा मोठा आधार आहे. अध्यात्माची गोडी ज्याला लागली त्याचे जीवन सुफळ संपन्न झाले असे म्हणायला हरकत नाही