Ashadhi Ekadashi 2024: रोज ९ मिनिटं विठ्ठल नाम घेतल्याने हृदय विकाराचा धोका टळतो का? तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:19 PM2024-07-17T16:19:40+5:302024-07-17T16:23:22+5:30

Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरीची वारी सुरु झाली की विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण होते ती आषाढी एकादशीच्या दिवशी. या पूर्ण प्रवासात वारीत सहभागी झालेले आणि वारीत सहभागी होऊ इच्छिणारे सगळेच भक्त विठ्ठलमय झालेले असतात. पण या विठ्ठल नामात खरंच एवढी ताकद आहे का? की त्यामुळे हृदय विकाराचा धोका टळू शकतो? तज्ज्ञांकडून मिळालेली माहिती जाणून घेऊ.

विठ्ठल नाम उच्चारताच हृदयाची स्पंदनं जाणवतात, पण हाच उपाय हृदय विकारावर परिणामकारक ठरू शकतो याबद्दल मध्यंतरी बराच उहापोह झाला होता. एवढेच नाही तर त्यावर वैज्ञानिकांची मोठी टीम संशोधन देखील करत होती. नामस्मरणाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो का, यावर संशोधन करण्यात आले.

याबाबतीत अध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी लोक सांगतात, 'शरीराचा आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध आहे. हे संतांनीदेखील विविध अभंगातून सांगितले आहे. 'मन करा रे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण', 'आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीले गा', 'काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल', 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले' अशी अनेक उदाहरणं घेता येतील. त्या अभंगांचा आशय लक्षात घेतला तर त्यामागे केवळ आध्यात्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण देखील आहे.

जसे की, ओम म्हटल्याने मेंदू शांत होतो, विठ्ठल नामाने हृदय ठोके नियंत्रित होतात, गायत्री मंत्राने स्मरण शक्ती वाढते, तालाची आवर्तन होतात तेव्हा आपल्या विचारांभोवती वलय तयार होतं आणि ज्या विषयात मन गुंतलेललं असतं त्यातून बाहेर पडून ईश्वर चरणी रुजू होतं. मात्र, अनेकांचा अनुभव असा आहे की एकट्याने नामस्मरण करताना मन विचलित होतं. यावर उपाय म्हणजे सत्संग!

पूर्वी अर्थात टीव्ही, मोबाईल नसतानाच्या काळात लोक रात्री मंदिरात येऊन भजन करत असत. महिन्यातून दोनदा येणारी एकादशी तर हक्काचीच! त्या रात्री जेवण आटोपून लोक मंदिरात गोळा होत असत. कथा-कीर्तनातून भगवंत भक्ती करत असत. समूहाने नामस्मरण केल्यामुळे मन विचलित होत नाहीच, शिवाय आळसही येत नाही. दोन्ही हातांनी जोरात टाळ्या वाजवल्यामुळे हाताचे ऍक्युपंक्चर पॉईंट ऍक्टिव्हेट होत असत आणि मुक्त कंठाने गायन केल्यामुळे तना-मनाचा ताण दूर होत असे.

शिवाय, इतर स्थानांच्या तुलनेत मंदिराचे स्थान हे नेहमीच पवित्र ठरते. मंदिराचे वलय अनुभवून नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवता येते. मंदिरात सुरुवातीलाच कासव असते. ते प्रतीकात्मक असते. मंदिरात प्रवेश केल्यावर आणि देवासमोर जाताना आपण आपले विकार त्याच्यासारखेच आकुंचन पावून घ्यायचे आणि विनम्र होत दर्शन घ्यायचं. काही न मागता केवळ ईश्वर भेट घेऊन बाहेर आल्याने आपण सुख दुःखाच्या पलीकडे जातो.

देहावरील हे सगळे सकारात्मक अनुभव नामस्मरणामुळे अनुभवता येतात. नामस्मरणाने मनातले वाईट विचार बंद होतात, म्हणून मनाला वळण लावून घ्यायचे, नामस्मरण रोज घेतले पाहिजे. पण त्यामुळे हृदयविकार जाऊ शकतो का? तर त्याबद्दल तज्ज्ञ सांगतात...

पुण्यातील एका वैद्यकीय संशोधन संस्थेत ३० जणांवर रोज सलग ९ मिनिटं 'विठ्ठल विठ्ठल विठ्ठल' जप करून घेण्यात आला असता लक्षात आले, की विठ्ठल नाम मोठ्याने घेतले असता आणि टाळ्या वाजवल्या असता रक्तदाब, पल्स रेट आणि हार्ट रेट नियंत्रित राहतो. मात्र...

हृदय विकार झालेल्या व्यक्तीने सलग ९ मिनिटं विठ्ठल नाम घेतल्याने तिचा हृदय विकार बरा होऊ शकतो असे कोणत्याही संशोधनात सिद्ध झालेले नाही. म्हणूनच काय, तर हृदय विकार झाल्यानंतर नामस्मरण सुरु करण्यापेक्षा आतापासून नियमित नामस्मरण सुरु करा आणि निरोगी राहा. जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल!