Ganesh Festival 2024: बाप्पाच्या मूर्तीची 'ही' पाच वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:21 AM2024-09-14T11:21:44+5:302024-09-14T11:43:10+5:30

Ganesh Festival 2024: बाप्पा घरी येऊन अनेक दिवस झाले आणि आता तर पाहुणचार घेऊन परतीची वेळही जवळ आली. बाप्पाची मूर्ति आपल्या समक्ष असूनही अनेक गोष्टी आपल्याकडुन दुर्लक्षित होतात. गणपती बाप्पा हा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती. त्याच्याकडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत. आबालवृद्धांना त्याचे रूप आवडते, पण त्याच्याकडून काही गोष्टी आत्मसात केल्या तर उपयोग! १७ सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशी अर्थाला बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. त्याआधी या पाच गोष्टी जाणून घेऊया. कोणत्या ते पहा!

बाप्पाचे डोळे छोटे असतात पण दूरदर्शी असतात. आपल्यालाही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने आणि दूरदृष्टीने बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जेणेकरून आपले नुकसान होणार नाही आणि भविष्य उज्ज्वल होईल.

कानावर पडणाऱ्या सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हे आपल्याला बाप्पाचे कान शिकवतात. दिवसभरात आपण असंख्य विषय ऐकतो. ते सगळेच डोक्यात आणि मनात साठवले तर मेंदू काम करेनासा होईल. म्हणून सूप जसे धान्य पाखडते तसे बाप्पा कानावर पडणाऱ्या गोष्टी पाखडून घेतो आणि चांगल्या गोष्टी साठवून अनावश्यक गोष्टी फेकून देतो. आपणही तसे केले तर अर्ध्याहून अधिक ताण क्षणात नष्ट होईल.

ज्याप्रमाणे उंदीर धान्याची नासाडी करतो, त्याप्रमाणे अनेक विषय आपले आयुष्य कुरतडत असतात. त्यांच्यावर अंकुष ठेवण्यासाठी बाप्पासारखे आपल्यालाही त्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. यासाठी आपल्या इच्छा कमी ठेवा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवा.

बाप्पाचे मोठे डोकं आपल्याला मोठा विचार आणि मोठे ध्येय ठेवायला उद्युक्त करते. जोवर आपण मोठा विचार करत नाही तोवर आपले ध्येय मोठे होत नाही आणि ध्येय मोठे नसेल तर हातून मोठी कृतीदेखील घडत नाही. यासाठी डोक्याचे आकारमान नाही तर विचारांचे आकारमान वाढवायची गरज आहे.

बाप्पाकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा गुण म्हणजे कुटुंबाशी एकोपा! गणांचा आणि गुणांचा अधिपती असूनही बाप्पाने अहंकाराच्या भरात आपल्या कुटुंबाला कधीही दूर केले नाही. उलट अहंकाराचा वारा लागू नये म्हणून आई वडिलांचा कायम मान राखला. बंधू प्रेम कायम ठेवून कुटुंबात एकोपा ठेवला. त्याप्रमाणे आपणही जगाशी जोडलेले असलो तरी आपल्या कुटुंबाला तोडू नका. कारण उद्या परिस्थितीत बदल झाला तर एकवेळ जग आपल्याला दूर लोटेल पण आपले कुटुंब नाही!