नवीन वर्षात ध्येयावर लक्ष केंद्रित कसे कराल? सांगताहेत गौर गोपाल दास प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:04 PM2021-12-31T17:04:47+5:302021-12-31T17:20:55+5:30

मागच्या दोन वर्षांची भरपाई काढायची असेल तर आता कंबर कसून ध्येयाकडे वाटचाल करायला हवी. वाटेत अडथळे, अडचणी येतच राहणार, परंतु त्यावर मात करून मार्ग कसा काढायचा, हे जाणून घेऊया अध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास प्रभू यांच्याकडून!

ते सांगतात, 'जर आपण एखाद्या विनोदावर वारंवार हसू शकत नाही, तर एकच दुःखं उगाळत किती काळ रडत बसायचे?' सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहणार आहे आणि तो राहिलाच पाहिजे. अन्यथा जीवन अळणी होऊन बसेल. सुखामागे दुःखं आणि दुःखामागे येणारे सुख आपल्याला दोहोंचे महत्त्व सांगते.

आजवरचा प्रवास करताना आपण सिंहावलोकन केले, तर लक्षात येईल की असे कितीतरी प्रसंग आपण निभावून नेले किंवा निभावले गेले. जर त्यातून आपण बाहेर पडू शकलो आणि इथवर आलो तर पुढचा टप्पा सुद्धा निश्चित यशस्वीपणे पार करू शकू. हा आत्मविश्वास मनात बाळगायला हवा.

जर आज तुम्ही सुखात असाल तर लक्षात ठेवा लवकरच दुःखाची गाठभेट होणार आहे आणि तुम्ही दुःखी असाल तर लवकरच सुखाची भेट होणारे. म्हणूनच आश्वासक वाक्य आपल्याला पूर्वजांनी लक्षात ठेवण्यास सांगितले आहे, 'हे ही दिवस जातील!'

ज्याप्रमाणे रस्त्यात खड्डे दिसले म्हणून आपण आपला प्रवास थांबवत नाही, त्याप्रमाणे ध्येयाच्या प्रावासात अडचणी आल्या म्हणून थांबू नका. प्रवास अर्धवट सोडू नका. ज्यांना ध्येय स्पष्ट दिसते, ते इतर अडथळ्यांवर लक्ष देत नाहीत. थांबून राहत नाहीत. तुम्हीसुद्धा थांबून राहू नका, ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू करा.