Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 02:11 PM2021-08-26T14:11:48+5:302021-08-26T14:17:01+5:30

Janmashtami 2021: महाभारत युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णांचे वय किती होते? श्रीकृष्ण एकूण किती वर्ष जगले? श्रीकृष्णांची रास काय होती? जाणून घेऊया...

श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णांना पूर्णावतार मानले जाते. श्रीकृष्णाचे नाव घेतले की, गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात, तसे श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही.

श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांची आठवण काढली जाते. मूळात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही ईश्वरी अवतार. आपल्या भारतीय संस्कृतीची ही दोन अत्युच्च शिखरे आहेत.

सर्व भारतीयांनी आदराने आणि अभिमानाने ज्यांचे नित्य स्मरण केले पाहिजे अशा या दोन महान विभूती आहेत. प्रभू रामचंद्रांनी स्वत:च्या आचरणातून 'मर्यादापुरुषोत्तम' ही बिरुदावली सार्थ करून दाखवली; तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि वेळेप्रसंगी अन्य व्यक्तींच्या सहकार्याने कशी मात करावी, ते शिकविले.

महाभारताचा हा महानायक, भागवतपुराण तर कितीही वेळा पारायणे केली तरीही त्याच्या आठवणी जागविण्यातील आनंद घेण्याचा मोह होतो. गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेता घेता उभे आयुष्य कमी पडते असा याचा महिमा. यंदा सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. तर, ३१ ऑगस्ट २०२१ रोजी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे.

महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चालले. अनेक वीर योद्धे यावेळी कामी आले. हातात शस्त्र न घेताही मुसद्देगिरी आणि नेमक्या धोरणांनी पांडवांना महाभारताच्या विजयश्रीपर्यंत श्रीकृष्णांनी नेले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्णांचे वय किती होते? एकूण किती वर्ष श्रीकृष्ण जगले? श्रीकृष्णांची रास काय होती? जाणून घेऊया... (lord sri krishna age at time of mahabharata)

श्रावण महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीविष्णूंनी आठवा अवतार कृष्णावतार धारण केला होता. ज्योतिषीय गणना आणि पुराणातील काही माहितीनुसार, कृष्णाचा जन्म अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि लग्न स्थान वृषभ असताना झाला. त्यावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान होता. एकंदरीत या ग्रहमानामुळे श्रीकृष्णांची रास वृषभ असल्याचे सांगितले जाते. (lord sri krishna zodiac sign)

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर टाकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ टाकला. दोन्ही सैन्यात युद्धासाठी ५ योजने ४० किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता. या सर्वांचे व्यवस्थापन श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते, असे सांगितले जाते.

महाभारत युद्ध हे धर्म आणि अधर्माच्या आधारावर लढले गेले, हे सर्वश्रुत आहे. यावेळी तत्कालीन गांधार, मद्र, सिंध, काम्बोज, कलिंग, सिंहल, दरद, अभीषह, मागध, पिशाच, कोसल, प्रतीच्य, ब्राह्मिक, उदीच्य, अंश, पल्लव, सौराष्ट्र, अवन्ति, निषाद, शूरसेन, शिबि, वसति, पौरव, तुषार, चूचुपदेश, अशवक, पाण्डय, पुलिन्द, पारद, क्षुद्रक, प्राग्ज्योतिषपुर, मेकल, कुरुविन्द, त्रिपुरा, शल, अम्बष्ठ, कैतव, यवन, त्रिगर्त, सौविर आणि प्राच्य आदी प्रांत; तर, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, मद्रनरेश शल्य, भूरिश्वा, अलम्बुष, कृतवर्मा, कलिंगराज, श्रुतायुध, शकुनि, भगदत्त, जयद्रथ, विन्द-अनुविन्द, काम्बोजराज, सुदक्षिण, बृहद्वलसहित अन्य हजारो योद्धे कौरवांच्या बाजून लढले.

महाभारतात अनेक प्रांत आणि योद्धे कौरवांच्या बाजून होते. तसेच बरेचसे पांडवांच्या बाजूनेही होते. यात, पांचाल, चेदि, काशी, करुष, मत्स्य, केकय, सृंजय, दक्षार्ण, सोमक, कुन्ति, आनप्त, दाशेरक, प्रभद्रक, अनूपक, किरात, पटच्चर, तित्तिर, चोल, पाण्ड्य, अग्निवेश्य, हुण्ड, दानभारि, शबर, उद्भस, वत्स, पौण्ड्र, पिशाच, पुण्ड्र, कुण्डीविष, मारुत, धेनुक, तगंण आणि परतगंण आदी प्रांत; तर, द्रौपदीचे पाचही पुत्र, सात्यकि, उत्तमौजा, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, पाण्ड्यराज, घटोत्कच, शिखण्डी, युयुत्सु, कुन्तिभोज, उत्तमौजा, शैब्य आणि अनूपराज नीलसह शेकडो योद्धे पांडवांच्या बाजूने लढले होते, असे सांगितले जाते.

तब्बल अठरा दिवसांनंतर महाभारत युद्ध अखेरीस शमले. यात पांडव पक्षाचा विराट आणि विराट पुत्र उत्तर, शंख आणि श्वेत, सत्याकीचे १० पुत्र, अर्जुनाचा पुत्र इरावात, द्रुपद, द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, कौरव पक्षाचे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर, प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर, कौरवांच्या बाजूने धृताराष्ट्राचे दुर्योधनासह सर्व पुत्र, भीष्म, त्रिगर्त नरेश, जयद्रथ, भगदत्त, द्रौण, दुःशासन, कर्ण, शल्य इत्यादी सर्व युद्धात मारले गेले.

महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. यापैकी कौरवांकडून कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा; तर, पांडवांकडून युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी आदी जिवंत राहिले. युयुत्सु हा कौरव पांडवांच्या बाजूने लढल्यामुळे तो एकच कौरव म्हणून जिवंत राहिला. बाकी सर्व कौरव युद्धात मारले गेले.

महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या. एका संशोधनानुसार महाभारत युद्ध झाले, त्यावेळी श्रीकृष्ण ८९ वर्षांचे होते, असे सांगितले जाते. महाभारत युद्धाच्या तब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली. (How many years did Lord Krishna live)

भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. ज्योतिषीय माहितीनुसार, कलियुगाचा आरंभ शक संवतच्या पूर्वी ३१७६ वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला होता. आत्ता शके १९४२ आहे. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, असे सांगितले जाते.