Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळ्याशी संबंधित 'या' गोष्टी नजरेस पडणे भरभराटीचे लक्षण ठरू शकते!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:07 PM2022-09-14T12:07:50+5:302022-09-14T12:11:07+5:30

Pitru Paksha 2022 :पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण-श्राद्ध केले जाते. पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची कृपादृष्टी लाभते आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन आपल्या नोकरी, व्यवसायात, शिक्षणात वृद्धी होते. परंतु पितर आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही, हे ओळखायचे कसे, याचा विचार करत असाल, तर पुढे दिलेली शुभ चिन्हे पितरांच्या कृपाशिर्वादाची तुम्हाला साक्ष पटवून देतील.

>> जर कावळ्यासाठी, कुत्र्यांसाठी, गायींसाठी ठेवलेले अन्न ते क्षणाचाही विलंब न करता खात असतील, तर हे लक्षण आहे की पूर्वज तुमच्यावर समाधानी आहेत आणि ते तुम्ही दिलेले अन्न स्वीकारत आहेत. तसेच तुमची सेवा त्यांच्यापर्यंत यथायोग्य पोहोचत आहे.

>> पितृ पक्षाच्या वेळी घराच्या छतावर येणारे आणि खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. अन्यथा अनेक घरात असाही अनुभव येतो, की नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाहीत. मात्र तुमचे घर त्याला अपवाद असेल तर तुमची श्रद्धा आणि श्राद्ध याचे ते फलित आहे असे समजायला हरकत नाही. हे एकार्थी भरभराटीचे लक्षण आहे.

>> कावळा आपल्या चोचीतून काड्या, पाने नेताना दिसला, तर ते पैसे मिळण्याचेही लक्षण आहे. या व्यतिरिक्त, जर कावळा फुले आणि पाने आणताना दिसला, तर याचा अर्थ असा की तुम्ही पूर्वजांकडून जे काही मागाल, ती इच्छा पूर्ण होईल.

>> एकाच वेळी दोन तीन कावळ्यांचे नैवेद्याच्या ताटाभोवती येणे याचा अर्थ आपल्या तिन्ही पिढ्या सुखात असून त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत!