Pitru Paksha 2023: पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच 'हे' आठ नियम पाळणेही धर्मशास्त्राच्या लेखी बंधनकारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 04:20 PM2023-09-28T16:20:44+5:302023-09-28T16:24:23+5:30

Pitru Paksh 2023: हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच १४ ऑक्टोबर पर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते. दानधर्म केला जातो. असे मानले जाते की पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने केल्याने त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते. श्राद्धविधींबरोबरच पितृपक्षात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते. आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो. म्हणून सामिष भोजन टाळावे.

जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते. त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्म जीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा, म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे. सूर्यास्तानंतर मनुष्येतर जीव विश्व झोपी जाते, त्यामुळे त्याकाळात श्राद्ध करून उपयोग नाही.

पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही, मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

पितृ पक्षात जर केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा. कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व असते. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा.

पितृ पक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे. अर्थात शरीरसंबंध टाळावेत. यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते.

प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका. विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका. वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मूक जीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते.

पितृ पक्षात लग्न, मुंडण, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये. किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये. हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे. त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता मात्र ती पार पाडावीत ती श्राद्ध काळानंतरच!

असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत. कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो. त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल.