Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:53 PM2024-09-20T13:53:49+5:302024-09-20T13:58:22+5:30

Pitru Paksha 2024: यंदा १८ सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू झाला आहे आणि २ ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होणार आहे. या काळात पितरांच्या नावे श्राद्ध व दानधर्म केले जाते.या कालावधीत पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांनी केलेल्या सेवेने तृप्त होऊन परत जातात अशी श्रद्धा आहे. पितृ पक्षाच्या दिवसांत जर आपण आपल्या पूर्वजांचे मनापासून स्मरण करून घरातील या ५ ठिकाणी दररोज दिवा लावला, तर पितृकृपेबरोबरच लक्ष्मी कृपाही प्राप्त होईल!

आपण रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावतो, कारण जिथे तुळशीजवळ दिवा लावलेला असतो, तिथे लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तुळशीजवळ दिवा तर लावायचाच शिवाय पुढील चार ठिकाणी देखील आठवणीने दिवा लावायचा. कारण, दिवा हा पितरांना आकर्षून घेतो. एखाद्या व्यक्तीची प्राणज्योत मालवली, तरीदेखील तिच्या पश्चात तेरा दिवस दिवा लावला जातो. पितृपक्षाच्या काळात लावलेला दिवा पितरांना आशीर्वादासाठी आमंत्रण देतो. मग तो नेमका कुठे लावायला हवा तेही जाणून घेऊ.

वास्तूमध्ये दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. पितरांचा वास दक्षिण दिशेला असतो, त्यामुळे पितृ पक्षाच्या १५ दिवसांत या दिशेला रोज चार वाती असलेला दिवा लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे सर्वात योग्य मानले जाते. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिशेला दिवा लावल्याने पितरांचा मार्ग प्रकाशमान होतो आणि त्यांच्या मार्गात कोणतेही अडथळे येत नाहीत, अशी श्रद्धा आहे.

पितृपक्षात दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ दिव्यात ठेवून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडावर देवी-देवतांसोबतच पूर्वजांचाही वास असतो. त्यामुळे पितृपक्षात दररोज येथे दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीही प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. पितृपक्षात संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच, पूर्वज आनंदी होतात आणि वंशजांना सदैव आनंदी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद देतात. माता लक्ष्मीही मुख्य दरवाजातून प्रवेश करते. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात हे स्थान स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवावे.

घरातील ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पूर्वजांची तसबीर ठेवली असेल, त्या ठिकाणी दिवा लावावा. जर तुमच्या घरामध्ये तसबिरी खाली दिवा ठेवण्याची व्यवस्था नसेल तर तसबिरीच्या दक्षिण दिशेला दिवा ठेवावा. हा उपाय केल्याने अपमृत्युचा धोका टळतो आणि घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही.

पितृ पक्षाच्या काळात घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. याशिवाय संध्याकाळी स्वयंपाकघरात पाण्याजवळ दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद वास्तूला लाभतो.