Swami Samartha : 'या' पाच गोष्टींचे पथ्य तुम्ही सांभाळा, बाकीच्या अडचणी स्वामी सांभाळून घेतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 05:32 PM2022-09-21T17:32:08+5:302022-09-21T17:43:54+5:30

Swami Samartha: आपल्यावरील दुःखाचा भार कमी व्हावा म्हणून आपण देवाची उपासना करतो. उपासनेने मन शांत होते व योग्य निर्णय घेण्यास, योग्य मार्ग निवडण्यास मदत होते. परंतु त्याचबरोबरीने गरज असते ती म्हणजे दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या चुका टाळण्याची आणि ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर आहेत, त्या स्वामींवर सोडून देण्याची! हाच आहे खरा परमार्थ! चला तर पाहूया, त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते...

आपल्यापेक्षा पुढे असणाऱ्याशी तुलना केल्याने दुःखं होते आणि आपल्यापेक्षा मागे असलेल्या लोकांशी तुलना केल्याने अहंकार सुखावतो. म्हणून तुलना नकोच. प्रत्येकाचा जगण्याचा मार्ग वेगळा आहे. आपल्याला आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करून कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अर्थात आपले भविष्य अधिक उज्ज्वल कसे होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

आपला बहुतांश वेळ केवळ काळजी करण्यात किंवा स्वप्नांचे इमले बांधण्यात वाया जातो. मात्र जे खरे कष्टकरी किंवा ध्येयवेडे असतात, ते स्वप्नं रंगवण्यात वेळ दवडत नाहीत तर स्वप्न साकार करण्यात वेळ कामी लावतात. विचार करून आपण कल्पनेच्या जगात वावरत राहतो. न घडणाऱ्या गोष्टींची चिंता करत बसतो. म्हणून ज्या गोष्टी आपल्या कुवतीबाहेर आहेत अर्थात ज्या बदलणे आपल्या क्षमतेपलीकडे आहे अशा गोष्टींचा भार देवावर सोपवून मोकळे व्हा.

भूतकाळात घडलेल्या गोष्टी, चुका यांचा विचार करत बसून किंवा भूतकाळातल्या रम्य गोष्टींच्या आठवणीत तरंगत राहून आपण वर्तमान आणि भविष्य बिघडवत असतो. भूतकाळ म्हणजे हातातून निसटून गेलेली वाळू... ती परत हातात घेता येणार नाही. म्हणून वर्तमानात जगा आणि भविष्य उजळून टाका.

कुछ तो लोग कहेंगे... हे किशोर कुमारांनी गायलेले गाणे कायम स्मरणात ठेवा. तुम्ही चांगले वागा नाहीतर वाईट, लोक नावे ठेवत राहतात. लोक देवालाही नावे ठेवतात, तिथे आपली काय कथा! त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा फार विचार करू नका. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा.

आनंदी राहणं हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. त्यामुळे आपला आनंद दुसऱ्यांमध्ये शोधणं बंद करा. कारण त्यांच्या वागणुकीवर अवलंबून राहिलात तर कायम दुःखात राहाल. म्हणून स्वतःचा आनंद स्वतः मध्ये शोधा. तुम्ही आनंदी असलात तरच दुसऱ्यांना आनंदी ठेवू शकाल हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यातली ही सूत्रं लक्षात ठेवलीत तर आयुष्याला अर्थ प्राप्त होईल आणि स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होईल.