'या' पाच गोष्टींची काळजी घेतली तर नवरा बायकोचे नाते घटस्फोट होण्यापासून वाचू शकते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 02:53 PM2022-01-01T14:53:59+5:302022-01-01T15:00:51+5:30

सद्यस्थितीत दर दहा घरांमागे एका घरात घटस्फोट झाल्याचे ऐकू येते. पूर्वी हे प्रमाण शंभरात एक होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. निदान भारतात तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम होता. आजही आहे. ज्या ठिकाणी द्वेष, तिरस्कार, मारहाण, विवाहबाह्य संबंध या गोष्टी असतात तिथे नाते टिकणे कठीण असते. परंतु नवरा बायकोचा अहंकार, बदलती आर्थिक गणिते आणि एकमेकांना समजून घेण्याचा अभाव अशी कारणे असल्यास नात्यांमधील दरी वाढताना दिसते.

धर्मग्रंथ, पुराण इत्यादींमध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनीही या नात्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कोणत्या गोष्टींमुळे हे नातं मजबूत होतं आणि कोणत्या गोष्टींमुळे हे नातं कमकुवत होतं, हे त्यांनी सांगितलं आहे. चाणक्य नीतीमध्ये पती-पत्नीला अशा ५ गोष्टी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात तुमच्या वैयक्तिक गोष्टी विशेषतः नवरा बायकोमधील गोष्टी तुमच्या जवळच्या मित्रासोबत शेअर करू नका.

प्रत्येक माणसामध्ये काही गुण आणि दोष असतात. पती-पत्नीने एकमेकांच्या गुणांचे कौतुक चार चौघात करावे पण दोष एकांतात सांगावेत.

जर पती-पत्नी दोघेही रागीट स्वभावाचे असतील तर त्यांच्या आयुष्यात कधीही शांती आणि आनंद येऊ शकत नाही. रागामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष, वितुष्ट निर्माण होते. यासाठी एक जण रागावलेला असताना दुसऱ्याने मौन बाळगा. राग निवळला की परिस्थिती बदलेल, पण शब्दाला शब्द देण्याची चूक करू नका.

पती-पत्नीच्या नात्यात जेवढे प्रेम असते, तेवढाच आदर महत्त्वाचा असतो. जर ते एकमेकांना सन्मानाने वागवत नसतील, पदोपदी अपमान करत असतील तर असे नाते फार काळ टिकू शकत नाही आणि टिकले तरी ते नाते कोणा एकाच्या तडजोडीमुळे टिकते.

पती-पत्नीचे नाते विश्वासावर आधारित असते. जर ते खोटे बोलत असतील किंवा एकमेकांपासून काही लपवत असतील, तर त्यांच्या नात्याचा पायाच डळमळीत होतो. अशा परिस्थितीमुळे त्यांचे नातेही संपुष्टात येते.

जोडीदाराशी जितके मित्रत्त्वाचे नाते दृढ कराल, तेवढे तुमचे आयुष्य सुखी आणि यशस्वी होईल. कारण वैज्ञानिक संशोधनातही सिद्ध झाले आहे की करिअर मध्ये यशस्वी होण्यामागे संसार यशस्वी असणे हे मुख्य कारण आहे. चला तर आपणही यशस्वी नात्याकडे आणि यशस्वी करिअर च्या दिशेने पाऊल टाकूया.