घरातील भांडण तंटा कमी होण्यासाठी खात्रीशीर उपाय करून पहा; नक्की बदल जाणवेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 02:40 PM2021-11-06T14:40:32+5:302021-11-06T14:53:09+5:30

घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दाखवणे महत्त्वाचे आहे. व त्याला वास्तुशास्त्रात दिलेल्या उपायांची जोड दिली, की वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि घरातले वातावरण सुदृढ होते. तुम्ही देखील या प्रश्नांना सामोरे जात असाल, तर पुढील उपाय अवश्य करून बघा.

घर घेताना किंवा बांधताना प्रत्येक खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश कसा येईल याकडे लक्ष द्या. तसेच राहत्या घरामध्ये अंधाराचे साम्राज्य फार काळ राहू देऊ नका. त्यामुळे नकारात्मकतेवर मात करता येईल व घरात प्रसन्न वातावरण राहील. अंधाऱ्या खोलीमुळे नैराश्य जाणवत राहते. म्हणून सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा.

बेडरूममध्ये लाकडी पलंग असणे शुभ असते. नवरा बायकोने दोन वेगवेगळ्या जोडलेल्या पलंगावर झोपण्याऐवजी सलग एका पलंगावर झोपावे. तसेच गादीसुद्धा एक असावी. दोन जोडलेल्या गाद्यांवर झोपण्यामुळे किंवा विभागलेलया पलंगावर झोपल्यामुळे नवरा बायकोत कटुता येते. म्हणून एकसंध गादी असलेला बेड झोपण्यासाठी वापरावा.

जेवायला बसताना पूर्व उत्तर दिशा निवडावी किंवा ते शक्य नसल्यास पूर्व दक्षिण दिशा निवडावी. शक्यतो सर्वांनी एकत्र जेवावे. आणि जेवताना कटू विषय टाळावे. मौन पाळणे उत्तम. परंतु एकत्र जेवल्याने स्नेह वृद्धिंन्गत होतो.

घरातल्या एखाद्या भिंतीला तडा गेली असेल तर ती भेग वेळेत बुजवून टाकावी. कारण ती भेग दीर्घकाळ ठेवणे अशुभ मानले जाते.

आपल्या दारात किंवा खिडकीत तुळशीचे रोप असतेच, परंतु ती दिशा पूर्व उत्तर असेल अशा बेताने तुळस ठेवावी. तुळस मुळात पवित्र असतेच, परंतु या दिशाबदलाचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला निश्चित दिसून येईल.

Read in English