Vastu Shastra: एखादी अनामिक भीती सतावतेय? कापराचे उपाय करून बघा, फरक पडेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:00 AM2023-02-06T11:00:19+5:302023-02-06T11:05:24+5:30

Vastu Tips: रोजचा दिवस नवनवी आव्हाने घेऊन येत असतो. या आव्हानांना सामोरे जाताना मनात शंका कुशंकांचे वादळ घुमत असते. अनामिक भीती मनाला सतावत असते. अशावेळी मनःस्थिती सुधारण्यासाठी परिस्थितीत काही आवश्यक बदल करावे लागतात. जेणेकरून बाह्य गोष्टींच्या प्रभावाने अंतर्मन शांत होते आणि निर्भय बनते. तसे झाले की निर्भय मनाचा आतून बाहेर असा प्रवास सुरु होतो. त्यासाठी सुरुवात बाहेरून आतल्या दिशेने करूया, तेही वास्तू शास्त्राच्या आधारे!

वास्तू तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या वास्तूला प्रसन्न ठेवणे ही आपली जबाबदारी असते. वास्तू स्वच्छ ठेवणे, प्रकाशमान ठेवणे, सुशोभित ठेवणे हे जितके महत्त्वाचे असते, तेवढीच ती सुगंधी ठेवणेही महत्त्वाचे असते. त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर आपोआप होतो. मात्र केवळ कृत्रिम गोष्टींचा वापर करून उपयोग नाही, तर नैसर्गिक गोष्टींचा यथायोग्य वापर केला पाहिजे असे वास्तू शास्त्र सांगते. त्यात मुख्यत्त्वे वापर केला जातो कापराचा!

वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, वास्तू प्रसन्न राहते. निरोगी राहते. त्या सुगंधामुळे घरात राहणाऱ्यांची मनस्थितीदेखील सुधारते. कापूर दीर्घकाळ टिकावा म्हणून आणि घरभर त्याचा सुगंध पसरावा म्हणून कापूर जाळण्यापूर्वी तुपात बुडवावा आणि मग लावावा. असे केल्याने संपूर्ण घर कापूरच्या सुगंधाने दरवळू लागते.

आपण कापूर पूजेत वापरतो. धुपारतीसाठी वापरतो. त्या सुगंधाने मन प्रफुल्लित होते. तशी मनःस्थिती कायम राहावी असे वाटत असेल तर सकाळ संध्याकाळ घरात कापराची एक वडी जाळावी आणि त्याचा सुगंध घरभर पसरेल अशा बेताने तो फिरवावा. कापूर लावलेला असताना मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा अशा स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे, तसे रोज केल्याने चिंतेचे काहूर मिटून मनातील अनामिक भीती दूर होईल.

जे लोक सतत आर्थिक संकटाचा सामना करत आहेत आणि या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत, त्यांना कापराचा तोडगा लाभदायी ठरू शकेल. अशा लोकांनी लाल कापडात कापराची वडी गुंडाळून तिजोरीत ठेवावी. दर दोन दिवसांनी कापडता कापराची वडी ठेवत सलग ४० दिवस हा प्रयोग करावा. त्यामुळे अर्थार्जनाचे नवीन मार्ग सापडतील आणि समस्या कमी होऊ लागतील.

घरात वरचेवर भांडणं होत असतील, कुटुंबीयांमध्ये मतभेद असतील तर सकाळ संध्याकाळ कापूर लावून गणपतीची आरती म्हणावी. कापूर जाळावा. घरातल्या सर्व सदस्यांना आरती द्यावी. असे रोज केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरातील सदस्यांमध्ये सौहार्दाचे नाते तयार होईल आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने कलहाचे प्रसंग उद्धभव्हणार नाहीत.

ज्या लोकांना वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते, त्यांनी सकाळ संध्याकाळच्या आरतीच्या वेळी तुपासह कापूर जाळावा. या उपायाने तुमच्या मार्गातील अडथळे कमी होऊन यशाचा मार्ग सापडेल आणि ठरवलेल्या कामांना गती मिळेल. यशस्वी व्हाल आणि धनवृद्धी होऊन नवीन आव्हानांना सामोरे जाल!