Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर अधिकार कुणाचा? घरसमृद्धीसाठी वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:52 AM2023-12-13T11:52:09+5:302023-12-13T11:54:57+5:30

Vastu Shastra: दिवसभर राबून आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळावे यासाठी! रोज शिरापुरीचा स्वयंपाक नसला तरी निदान मीठ भाकरी वर सगळ्यांची गुजराण होते. म्हणून वास्तुशास्त्र सांगते, आपण ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, रांधून वाढतो ती भांडी कधीच उष्टी खरकटी ठेवू नयेत. रात्री झोपण्यापूर्वी आपण आपला ओटा जसा स्वच्छ करतो तशीच भांडी घासून टाकावीत. त्या स्वच्छतेमुळे अन्नपूर्णा देवी संतुष्ट होते आणि आशीर्वाद देते.

आजच्या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिवसभराचा थकवा पेलून रात्री भांडी घासून झोपणे शक्य होत नाही, त्या ते काम मोलकरणीसाठी ठेवून देतात. काही गोष्टींचे नाईलाजाने पालन करता आले नाही तरी पर्यायी व्यवस्थेचा जरूर वापर करावा. ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्याला दोन वेळेच्या पोळ्या-भाकरी रांधून देणारी भांडी अर्थात पोळपाट, लाटणे स्वच्छ धुवून जागेवर ठेवावे. एवढे तर आपण करूच शकतो ना? या एका नियमाबरोबरच आणखी चार गोष्टींचे पालन करा, जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही.

>> अनेकांना तव्यावरची गरम पोळी आवडते. परंतु शास्त्र सांगते, गरम अन्न ताटात घ्यावे, त्याचा नैवेद्य दाखवावा, कावळ्याला, कुत्र्याला भाकर तुकडा वाढावा मग निवांत बसून खावे. आधाशीपणे किंवा हातात खाणे दारिद्रयास कारण ठरते.

>>पहिली पोळी-चपाती-भाकरी गायीला, कुत्र्याला कावळ्याला दिल्याने घरात आर्थिक वृद्धी होते. सर्व जीवांना संतुष्ट करून मग मग आपण जेवावे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यालाच वास्तूचा दुजोरा आहे. वास्तू तेव्हाच तृप्त होते, जेव्हा तेथील जीव संतुष्ट असतात.

>>गरम तव्यावर पाणी टाकू नये. त्यावर ओरखडे येतील अशी घासणी वापरू नये. तवा पोळपाट नेहमी स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. एकतर तवा खराब होतो आणि तो लवकर निकामी होतो हे त्यामागचे कारण असावे.

>> जी व्यक्ती पोळी करते तिनेच तवा चुलीवरून उतरवावा असेही शास्त्र सांगते, अन्यथा जी व्यक्ती तवा उचलते तिच्याशी अकारण वाद उद्भवतात. आपले काम आपणच पूर्ण करावे असा त्यामागील युक्तिवाद असावा असे म्हणता येईल.

>> सगळ्यांचे जेवण झाले तरी घरात एखादा भाकर तुकडा, चतकोर पोळी शिल्लक ठेवावी. जेणेकरून दारावर कोणी भिक्षेकरी आल्यास किंवा एखादा कुत्रा मांजर दिसल्यास त्यांना ती पोळी देऊन अन्नदानाचे रोज थोडे थोडे पुण्य गोळा करता येते.