कर्जाचा EMI बोजा ठरू लागलाय? मग कमी करा ना, हजारो लोक वापरतात ही ट्रिक; तुम्हीही वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:28 PM2022-02-09T16:28:46+5:302022-02-09T16:33:08+5:30

हजारो ग्राहक वापरत असलेली ट्रिक वापरा; दर महिन्याला पैसे वाचवा!

कोरोनाच्या संकटात सापडलेली अर्थव्यवस्था हळूहळू बाहेर येत आहे. कोरोनाच्या फटक्यातून अर्थव्यवस्था सावरावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयनंदेखील दिलासा दिला आहे.

आरबीआयच्या धोरणामुळे कर्जाचे दर ऐतिहासिक निचांकी पातळीवर आहेत. याचा फायदा कॉर्पोरेट कर्जदार घेत आहेत. याशिवाय इतर ग्राहकदेखील या परिस्थितीचा लाभ घेत आहेत. यामुळे दर महिन्याला कर्जदारांची आर्थिक बचत होत आहे.

ग्राहक स्वस्त कर्जासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे जात असल्याचं दिग्गज बँकांच्या प्रमुखांनी सांगितलं. खाण क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या वेदांतानं ८ हजार कोटी रुपयांचं कर्ज युनियन बँक ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीनं २०२० मध्ये एसबीआयकडून १० हजार कोटींचं कर्ज घेतलं होतं.

वेदांतानं एसबीआयकडून १०.५ टक्के दरानं कर्ज घेतलं होतं. आता हेच कर्ज युनियन बँक ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करून व्याज दर २ टक्के कमी करण्याचा वेदांताचा मानस आहे. हाच फंडा आता गृह कर्जधारकदेखील वापरत आहेत.

गृह कर्ज सुरक्षित असल्यानं ग्राहक बँकांवर व्याज दर कमी करण्यासाठी किंवा ते हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचं बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक स्वरुप दासगुप्ता यांनी सांगितलं.

सध्या ग्राहकांकडे अनेक बँकांचे पर्याय उपलब्ध आहेत. व्याज दर कमी आहेत. त्यामुळे ग्राहक एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे कर्ज हस्तांतरित करून दर महिन्याला काही शे रुपये वाचवत आहेत.

ग्राहक कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी वापरत असलेल्या या क्लृप्तीमुळे अनेक बँका नव्या कर्जाचं वाटप करण्यासाठी वर्किंग कॅपिटल वापरूच शकत नसल्याची परिस्थिती आहे. एसबीआयकडे २.०६ लाख कोटी रुपये इतकं वर्किंग कॅपिटल आहे. यातलं १.९९ लाख कोटी रुपयांचा वापरच होत नाहीए.

येणाऱ्या तिमाहींमध्ये परिस्थिती सुधारेल अशी आशा पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य कार्यकारी एस एस मल्लिकार्जुन राव यांनी व्यक्त केली. आरबीआय व्याजदारांमध्ये वाढ करेल. त्यानंतर कर्ज हस्तांतरणांपासून बँकांना दिलासा मिळेल, असं त्यांनी सांगितलं. सध्या ग्राहक स्वस्त कर्जासाठी वारंवार कर्ज हस्तांतरित करत आहेत. ग्राहक कमी होऊ नयेत म्हणून बँकांनादेखील कर्जाचे दर कमी करावे लागत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.