कोरोनामध्ये ग्राहकांनी सोनं खरेदीचा मार्ग बदलला, छोट्या दुकानांऐवजी मोठ्या ब्रँड्सला अधिक पसंती; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 01:31 PM2021-05-30T13:31:30+5:302021-05-30T13:34:42+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसह अनेक गोष्टींवर खूप मोठा परिणाम झाला आणि होतोय. तसाच तो सोनं खरेदीवर झाला आहे. यात एक नवा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊयात...

कोरोनामुळे बाजारात वाढणाऱ्या अनिश्चिततेमुळे सोनं खरेदीच्या पर्यायाच्या पसंतीत ग्राहकांनी बदल केल्याचं दिसून आलं आहे. कोरोना काळात ग्राहक छोट्या दुकानदारांपेक्षा मोठ्या दुकानांना अधिक पसंती देत आहेत

कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमन यांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या बाजारात हजारो लहान दुकानदारांची महत्वाची भूमिका राहिली आहे. पण कोरोना महामारीमुळे ग्राहक लहान दुकानदारांपासून दूर जात असल्याचं दिसून आलं आहे.

सोन्याची मागणी गेल्या दोन दशकांपेक्षाही निच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. दरम्यान २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये सोनेच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आर्थिक गाडा रुळावर येण्यास सुरुवात झाली होती.

बाजारात पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण निर्माण होत होतं. विशेषत: जनवरी ते मार्च या तिमाहीत ग्राहकांच्या मागणीत मोठा बदल दिसून आला. लग्नसंमारंभ आणि इतर कारणांसाठी सोनं खरेदी करताना ग्राहकांनी छोट्या दुकानांऐवजी मोठ्या ब्रॅन्ड्सला अधिक पसंती दिली. यामुळे कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात यंदा ५४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली, असं कल्याणरमन यांनी सांगितलं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कमॉडिटी रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी सांगितलं की, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय ब्रँड्समध्ये होत असलेला बदल स्पष्ट स्वरुपात दिसून येत आहे. कारण ग्राहक आता गुणवत्तेच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत आणि मोठ्या ब्रँड्सबाबत अधिक सुरक्षित भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या असंघटीत क्षेत्रासाठी मोठी अडचण ठरताना दिसत आहे"

नामांकीत ब्रँड्सच्या दुकानांमधून सोनं खरेदीमध्ये वाढ झाल्यामागे डिजिटलायझेशनमध्ये झालेल्या प्रगतीचंही कारण देण्यात येत आहे. याशिवाय वस्तू आणि सेवा करात दिली जाणारी सूट देखील यामागचं कारण असू शकतं.

केंद्र सरकारकडून गुणवत्तेच्या मानकांमध्ये वाढ करण्यात आल्यानं टाटा समूहाच्या टायटन कंपनी, कल्याण आणि मालाबार गोल्ड अँड डायमंड्स सारख्या अनेक शाखा असणाऱ्या दुकानांमध्ये गुणवत्तेत मोठी सुधारणा झाली आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या दुकानांना अधिक पसंती देऊ लागले आहेत.

कल्याण ज्वेलर्सचे जवळपास ६० टक्के स्टोअर्स हे दक्षिण भारतात आहेत. केरळस्थित या ब्रँडनं यंदाच्या वर्षात देशात एक डझनहून अधिक दुकानांची वाढ करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

भारताबाहेरही मोठ्या ब्रँड्सच्या शाखा असल्यानं गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड या दुकानांमध्ये केली जात नाही.