Indian Railways: भारतीय रेल्वेची बक्कळ कमाई; एका महिन्यात मालवाहतुकीतून ११ हजार कोटींची मिळकत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 06:13 PM2021-07-04T18:13:18+5:302021-07-04T18:17:13+5:30

Indian Railways: कोरोनाच्या संकट काळात मालवाहतूक सेवेकडे संधी म्हणून पाहिल्याने भारतीय रेल्वेला त्याचा मोठा फायदा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून आजपर्यंत कधीही न थांबलेली भारतीय रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. याचा मोठा फटका भारतीय रेल्वेला बसल्याचे पाहायला मिळाले.

पहिली लाट ओसरल्यानंतर रेल्वेने लांबपल्ल्याच्या तसेच लोकल सेवा मर्यादित स्वरुपात सुरू केल्या. कोरोनाच्या संकट काळात मालवाहतूक सेवेकडे संधी म्हणून पाहिल्याने भारतीय रेल्वेला त्याचा मोठा फायदा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

सप्टेंबर २०२० ते जून २०२१ या कालावधीत सलग १० महिन्यांमध्ये रेल्वेने केली विक्रमी मालवाहतूक केली आहे. मात्र, केवळ एका महिन्यात जून महिन्यात मालवाहतुकीतून रेल्वेने ११ हजार १८६.८१ कोटींचा महसूल मिळवला आहे.

भारतीय रेल्वेने जून महिन्यात ११२.६५ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. जून २०१९ च्या तुलनेत त्यात ११.१९ टक्के वाढ झाली. २०२९ हे सामान्य वर्ष होते आणि याच कालावधीतील ही मालवाहतूक जून २०२० च्या तुलनेत २०.३७ टक्के जास्त होती.

जून २०२१ मध्ये वाहतूक केलेल्या महत्वाच्या वस्तूंमध्ये ५०.०३ दशलक्ष टन कोळसा, १४.५३ दशलक्ष टन लोह धातू, ५. ५३ दशलक्ष टन कच्चे लोखंड आणि तयार पोलाद, ५. ५३ दशलक्ष टन खाद्यान्न, ४.७१ दशलक्ष टन खते, ३.६६ दशलक्ष टन खनिज तेल, ६.५९ दशलक्ष टन सिमेंट आणि ४.२८ दशलक्ष टन पक्क्या विटा यांचा समावेश आहे.

जून २०२० मध्ये ८८२९.६८ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. २०२१ च्या जूनमध्ये भारतीय रेल्वेला मालवाहतुकीच्या माध्यमातून ११ हजार १८६.८१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

यंदा महसुलात २६.७ टक्के वाढ झाली. जून २०१९ च्या तुलनेत ४.४८ टक्के जास्त आहे. रेल्वेच्या विद्यमान जाळ्यामध्ये मालगाड्यांची गती वाढविण्यात आली आहे.

जून २०१९ च्या तुलनेत ४.४८ टक्के जास्त आहे. रेल्वे मालवाहतूक अत्यंत आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून बऱ्याच सवलती, सूटही दिली जात आहे.

गेल्या १९ महिन्यांत मालवाहतुकीचा वेग दुपटीने वाढला आहे. कोरोना संकटाच्या काळाचे भारतीय रेल्वेने सर्वांगीण कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्याच्या संधीच्या रूपात परिवर्तन केले आहे.

मालवाहतुकीसोबत भारतीय रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस मोठ्या प्रमाणावर चालवत अनेक राज्यांतील नागरिकांना दिलासा दिल्याचे सांगितले जात आहे.