Post Officeच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि निवांत राहा, ₹५ लाखांच्या गुंतवणूकीवर गॅरंटीड मिळतील ₹१० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 08:58 AM2024-07-09T08:58:56+5:302024-07-09T09:09:33+5:30

KVP Post Office Scheme: जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला गॅरंटीड परतावा मिळावा अशी इच्छा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या योजना मिळतील.

KVP Post Office Scheme: जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला गॅरंटीड परतावा मिळावा अशी इच्छा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या योजना मिळतील. यापैकी किसान विकास पत्र हे एक आहे. दीर्घकालीन आर्थिक बचतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सरकारनं १९८८ मध्ये ही योजना सुरू केली.

सुरुवातीला ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी होती, पण आता कोणताही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. सध्या या योजनेवर ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. केव्हीपी योजना ११५ महिन्यांत म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यांत आपली गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी देते. जर तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले तर ११५ महिन्यांनंतर जेव्हा ती मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला १० लाख रुपये परतावा म्हणून मिळतील.

केव्हीपीमधील गुंतवणूक केवळ १००० रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. पण जर तुम्ही यात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली असेल तर पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे. मनी लाँड्रिंगच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी सरकारनं २०१४ मध्ये किसान विकास पत्रातील ५०,००० रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं होतं.

जर तुम्हाला १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील. यामध्ये सॅलरी स्लिप, आयटीआर, बँक स्टेटमेंट आणि आधार नंबर अशा कागदपत्रांचा समावेश आहे.

ज्यांच्याकडे एकरकमी भरण्यासाठी पैसे आहेत पण त्यांना त्या पैशातून कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही, तसंच नजीकच्या भविष्यात त्यांना या पैशाची गरज नाही, अशा लोकांसाठी किसान विकास पत्र ही योजना अतिशय फायद्याची ठरू शकते.

१८ वर्षांवरील कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेअंतर्गत सिंगल किंवा जॉईंट खातं उघडू शकते. याशिवाय १० वर्षांवरील मूल आपल्या नावे किसान विकास पत्र घेऊ शकते. अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीनं पालक खाते उघडू शकतात.

अनिवासी भारतीयांना यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. खातं उघडताना आधार कार्ड, वयाचा पुरावा, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अर्जाचा फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

तुम्ही काही अटींसह या स्कीममधून प्री मॅच्युअर रक्कम काढू शकता. खातं उघडल्यापासून २ वर्ष ६ महिन्यांच्या कालावधीनंतर प्री मॅच्युअर विड्रॉल करता येतं. त्याचबरोबर प्री-मॅच्युअर डिपॉझिट काही विशिष्ट परिस्थितीत केव्हाही करता येतात यामध्ये केव्हीपी होल्डर किंवा जॉईंट अकाऊंट होल्डरपैकी एकाचा किंवा सर्वांचा मृत्यू झाल्यास, न्यायालयानं आदेश दिल्यास, जपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत जप्त केल्यास यातून रक्कम विड्रॉल करता येते.