डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:19 PM2024-10-01T16:19:43+5:302024-10-01T16:28:08+5:30

Digital Arrest: एक व्हिडीओ कॉल किंवा ईमेल तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. कारण पोलीस, ईडी, सीबीआय अधिकारी म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने गंडवले जाते की तुम्हाला ते खोट आहे, हे तुम्हाला कळतही नाही.

आधी मेसेजवर लिंक यायची क्लिक केलं की बँक खात्यातील सगळे पैसे गायब. नंतर पैसे लकी ड्रॉ, लॉटरी लागल्याचे सांगून सायबर ठग लुटायचे. पण, आता त्यांनी थेट डिजिटल अरेस्ट प्रकार सुरू केले आहेत. यात अनेक उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती फसले आहेत. त्यांच्याकडून या सायबर ठगांनी कोट्यवधी रुपये उकळले.

काही दिवसांपूर्वी वर्धमान ग्रुपनचे चेअरमन आणि पद्म भूषण एस.पी. ओसवाल हे या या सायबर ठगांच्या जाळ्यात अडकले आणि ७ कोटी रुपये गमावून बसले.

पद्म भूषण ओ.पी.ओसवाल यांच्याप्रमाणेच तुम्हाच्याकडचेही पैसे हे सायबर ठग काढून घेऊ शकतात. त्यासाठी ते ज्या क्लृत्या लढवतात, त्या ऐकून तुम्ही चक्रावून जाल.

डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारीतील नवा प्रकार आहे. अटक करण्याची प्रक्रिया अशी असते की, पोलीस येतात आणि तुम्हाला घेऊन जातात. पोलीस कोठडीत ठेवतात. पण, डिजिटल अरेस्ट फ्रॉड करणारे तुम्हाला काही, काही दिवस तुम्ही जिथे आहात, तिथेच अरेस्ट करून ठेवू शकतात.

सायबर ठग व्हिडीओ कॉल करतात आणि तुम्हाला पोलीस असल्याचे किंवा सीबीआय अधिकारी, ईडी अधिकारी असल्याचे सांगतात. तुम्हाला कॉलवरून माहिती देतात आणि नंतर धमकवायला सुरूवात करतात.

तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे, ज्यात ड्रग्ज आहे किंवा कुठल्या तरी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात तुमचे नाव आहे किंवा कुठल्यातरी गंभीर गुन्ह्यात तुमचे नाव असून, आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत, असे सांगतात.

तुम्हाला घाबरवल्यानंतर सायबर ठग म्हणतात की, व्हिडीओ कॉल तुम्ही कट केला, तर आम्ही तिथे येऊन तुम्हाला अटक करू आणि तुरुंगात टाकू. हा घटनाक्रम इतका वेगाने होतो की, कोणत्याही व्यक्तीला काय करावं ते कळत नाही.

महत्त्वाचे म्हणजे कॉल केलेल्या व्यक्ती पोलीस ठाणे, ईडी कार्यालय, सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे तुम्हाला दिसते, पण तो चित्रपटासाठी बनतात, तसा सेट असतो. त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की हा व्यक्ती खरंच अधिकारी आहे आणि अटक करेल.

तुम्ही घाबरून जाईपर्यंत ते खूप गोष्टी सांगतात. तुम्ही एकदा अडकले की परत सुटणार नाही. तुम्हाला किती वर्षांचा तुरुंगावास होऊ शकतो. तुम्ही घाबरले की, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला पैसे मागतात. त्यांच्या या जाळ्यात अनेक उद्योजक, व्यावसायिक, अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा कॉल आला, तर जवळच्या पोलीस ठाण्यात तुम्ही चौकशी करू शकतात.