कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:49 PM2024-10-07T12:49:49+5:302024-10-07T13:05:04+5:30

PM Shram Yogi Mandhan Yojana : भारतात अनेक कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात.

भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील करोडो लोकांना सरकारी योजनांचा लाभ होत आहे. बहुतांश सरकारी योजना देशातील गरीब आणि गरजू लोकांना डोळ्यासमोर ठेवून आणल्या जातात. भारतात अनेक कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात.

अशा कामगारांचे उत्पन्न आणि पेन्शन अजिबात स्थिर नसते. अशा लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकार एक योजना आणली आहे. या योजनेतंर्गत कामगारांना दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते. त्यामुळे या योजनेचा कामगार कसा लाभ घेऊ शकतात. तसेच या योजनेचे काय फायदे आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

भारत सरकारनं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी २०१९ मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर सरकार दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देते. त्यासाठी कामगाराने दिलेल्या योगदानाप्रमाणे सरकार या योजनेला तेवढीच रक्कम देते. म्हणजेच, जर एखाद्या कामगाराने १०० रुपये जमा केले. तर सरकार फक्त १०० रुपये जमा करते.

योजनेत सामील होण्यासाठी कामगारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जेणेकरून किमान २० वर्षे योजनेत योगदान देता येईल. वयाच्या ६० वर्षांनंतर सरकार दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देते. योजनेत जितक्या लवकर अर्ज केला जाईल. प्रीमियमची रक्कम तितकीच कमी भरावी लागते.

केवळ असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. यामध्ये रिक्षाचालक, घरकामगार, चालक, विणकर, प्लंबर, पथविक्रेते, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, बांधकाम कामगार, कचरा वेचणारे, विडी बनवणारे, हातमाग कामगार, शेती कामगार, मोची, धुलाई, चामडे कामगार आणि इतर मजूर यांचा समावेश आहे.

पीएम श्रम योगी मानधन पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कामगारांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. त्यानंतर ते आपले आधार कार्ड आणि बँक डिटेल्ससह योजनेत नोंदणी करू शकतात. फोन नंबर बँक खात्याशी लिंक आवश्यक आहे. तुम्ही तुमचे खाते उघडताच तुम्हाला त्याची माहिती तुमच्या मोबाईल नंबरवर मिळते.

याचबरोबर, या योजनेची प्रीमियम रक्कम तुमच्या खात्यातून ऑटो-डेबिट केली जाते. मात्र, या योजनेत पहिल्यांदा योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही १८०० २६७ ६८८८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.