Nitish Kumar Net Worth: ३ बँक अकाऊंट, १३ गायी, दिल्लीत फ्लॅट; 'किंगमेकर' नितीश कुमारांची किती आहे नेटवर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:32 AM2024-06-06T08:32:32+5:302024-06-06T09:04:24+5:30

Nitish Kumar Net Worth: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सातत्यानं चर्चेत आहेत. केंद्रात नवं सरकार स्थापन करण्यात ते 'किंगमेकर'च्या भूमिकेत आलेत. पाहूया किती आहे त्यांची संपत्ती.

Nitish Kumar Net Worth: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सातत्यानं चर्चेत आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. केंद्रात नवं सरकार स्थापन करण्यात ते 'किंगमेकर'च्या भूमिकेत आलेत. अलीकडच्या काळापर्यंत त्यांचं राजकीय प्रवास संपण्याच्या जवळ असल्याचं बोललं जात होतं.

परंतु, नितीशकुमार ज्या पद्धतीनं परतलेत, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या सर्व चर्चांनंतर नितीश कुमार यांनी आता आपण एनडीएचा भाग राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. आता येत्या काही दिवसांत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन होईल. राजकारणात माहिर असलेल्या नितीशकुमार यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया.

जानेवारी महिन्यात नितीश कुमार सरकारनं आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची आर्थिक स्थिती जाहीर केली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे २२,५५२ रुपयांची रोकड असून तीन बँक खात्यांमध्ये ४८,००० रुपये जमा आहेत. दिल्लीतील द्वारका भागात त्यांचा एक हजार चौरस फुटांचा फ्लॅट आहे. नितीश यांनी २००४ मध्ये हा फ्लॅट १३.७८ लाख रुपयांना विकत घेतला होता. याची सध्याची किंमत १.४८ कोटी रुपये आहे.

याशिवाय नितीश यांच्याकडे ११.३२ लाख रुपये किमतीची फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि १.२८ लाख रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय नितीश यांच्याकडे १३ गायी आणि १० वासरं आहेत. त्यांची एकूण किंमत १.४५ लाख रुपये आहे. या मालमत्तांवरून त्यांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असल्याचं दिसून येतं. ही माहिती आपल्याला बिहारच्या मुख्यमंत्र्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या मालमत्तेबद्दल स्पष्ट चित्र देते.

नितीश कुमार यांचा भाजपशी संबंध १९९० च्या दशकाच्या मध्यापासून आहे, जेव्हा नितीश कुमार यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं.

ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत त्यांनी समता पक्षाची स्थापना केली होती. १९९८ ते २००४ या काळात देशात सत्तेवर असलेल्या भाजपसोबत युती करताना नितीशकुमार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ही महत्त्वाची खाती सांभाळली होती.

नंतर शरद यादव यांच्या लोकशक्ती आणि समता पक्षाचं विलीनीकरण करून जदयूची स्थापना करणारे नितीश कुमार यांनी २००५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून विजय मिळवला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

२००२ च्या गुजरातमधील दंग्यांनंतर भाजपसोबतची १७ वर्षांची भागीदारी संपुष्टात आणत त्यांनी २०१३ मध्ये संबंध तोडले. २०१४ मध्ये नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपले जुने विश्वासू जीतनराम मांझी यांच्याकडे आपली खुर्ची सोपवली.