गृहकर्जावर Top-Up घेण्याचा विचार करताय?; RBI चिंता, सामान्यांची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:37 PM2024-08-08T19:37:38+5:302024-08-08T19:47:57+5:30

गृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात वारंवार टॉप अप घेण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. त्यावर आरबीआयनं चिंता व्यक्त केली.

तुम्ही गृहकर्ज घेतलं आहे का? आरबीआय रेपो रेट कमी करेल अशी तुम्हाला अपेक्षा होती का? तुम्ही भविष्यात तुमच्या गृहकर्जावर टॉप अप करण्याचा विचार करत आहात का? मग तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेली माहिती जाणून घ्यावी, कारण तुम्हाला येत्या काही दिवसांत गृहकर्ज टॉप-अप करण्यात अडचणी येऊ शकतात.

RBI च्या म्हणण्यानुसार, लोकांकडून गृहकर्जावर टॉप अप घेण्याची मागणी वाढलेली दिसते. ही चिंतेची बाब आहे. तीही अशा वेळी जेव्हा लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे बँका आणि कर्ज पुरवठादारांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. बँकांनी गृहकर्ज टॉप-अपच्या वापराची चौकशी करावी असं RBI ने म्हटलं आहे.

शक्तिकांता दास म्हणाले की, होम लोन टॉप-अप वेगाने वाढत आहे. सोन्याच्या कर्जाप्रमाणेच बँका आणि NBFC सुद्धा ते लोकांना झपाट्याने उपलब्ध करून देत आहेत. परंतु कर्जाची रक्कम मालमत्तेच्या किमतीच्या प्रमाणात असणे, त्याच्याशी निगडीत जोखीम आणि फंडचा योग्य वापर यासंबंधीचे नियामक नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

काही लोक होम लोन टॉप-अप सुविधा पुन्हा पुन्हा वापरत आहेत. यामुळे कर्जाच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी अशा प्रकरणांचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे असंही आरबीआयनं सूचित केले आहे.

काय असते Home loan Top Up? - साधारणपणे, जेव्हा एखादी व्यक्ती गृहकर्ज घेते तेव्हा तो मालमत्तेच्या मूल्याच्या प्रमाणात उपलब्ध जास्तीत जास्त कर्ज घेतो. यानंतर, जेव्हा काही काळानंतर त्याच्या मालमत्तेचे मूल्य वाढते आणि त्या व्यक्तीने गृहकर्जाचा काही भाग भरलेला असतो तेव्हा तो बँकेत जातो आणि गृह कर्जावर टॉप अप घेतो.

उदाहरणार्थ - समजा, तुम्ही तुमच्या कारचे कूलंट सर्व्हिसिंगच्या वेळी बदलले आहे. काही वेळाने तुम्ही पुन्हा तुमची कार सर्व्हिसला घेऊन जाता. यावेळी तुमचे कूलंट खराब झाले नाही, परंतु ते थोडे कमी झाले. अशा परिस्थितीत, ते बदलण्याऐवजी, आपण ते टॉप अप करतो. हे कमी किमतीत तुमच्या कूलंटची कार्यक्षमता पुन्हा वाढवते.

त्याचप्रमाणे होम लोन टॉप-अप केल्यानंतर लोकांच्या EMI मध्ये फारसा फरक पडत नाही. उलट स्वस्त व्याजाने मिळालेला हा पैसा त्यांची लिक्विडिटी वाढवतो. नियमानुसार, गृहकर्ज टॉप-अपची रक्कम मालमत्तेच्या देखभालीसाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी वापरली जावी पण आजच्या काळात त्याचा इतर उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

होम लोन टॉप-अप बाबत आरबीआयची चिंता देखील रास्त आहे कारण अलीकडच्या काळात देशातील शेअर बाजारात लोकांची गुंतवणूक वाढली आहे. सरकारलाही याची जाणीव आहे आणि त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीला परावृत्त करण्यासाठी अर्थसंकल्पात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सबाबत बदल करण्यात आले आहेत.

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये लोकांनी गुंतवणूक वाढवल्याचा परिणाम असा झाला आहे की बँकांच्या ठेवी सतत कमी होत आहेत. काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमधून समोर आलं की, बँकांच्या ठेवी कमी होत आहेत कारण लोक पैसे बँकांमध्ये ठेवण्याऐवजी ते शेअर बाजार इत्यादींमध्ये गुंतवत आहेत.

देशातील कर्ज आणि ठेवींमधील वाढत्या तफावतीने चिंतेत आलेल्या आरबीआयने वाढत्या लोकप्रिय डिजिटल कर्जांवर लक्ष ठेवण्याची घोषणा केली आहे. देशात डिजिटल कर्ज देण्याच्या विकासासाठी विविध उपायांवर आधीच काम करत आहे असं आरबीआयनं सांगितले. डिजिटल कर्ज म्हणजे झटपट एक क्रेडिट फॉर्म घेऊन ज्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता आणि तुमच्या खात्यात अल्पावधीत पैसे येतात.