Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:36 PM2022-03-13T17:36:16+5:302022-03-13T17:44:35+5:30

Post Office Scheme: इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार ही योजना देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

अनेकजण भविष्यातील पैशांचा गरजा पूर्ण करण्यासाठी तारुण्यावस्थेतच गुंतवणूक सुरू करतात. सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील काहींमध्ये जोखीम आहे, तर काहींमध्ये जोखीम नाही.

तुम्ही सुरक्षित आणि शून्य जोखमीची गुंतवणूक शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस बचत योजना 'किसान विकास पत्र' (Kisan Vikas Patra) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अल्प बचत करणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ही एक उत्तम योजना आहे.

किसान विकास पत्र योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. यासह, ही योजना केवळ परताव्याची पूर्ण हमी देत ​​नाही तर इतर पर्यायांपेक्षा अधिक फायदे देखील देते. या योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे 124 महिन्यांत दुप्पट होतात.

तुम्ही या योजनेत 1 एप्रिल 2022 रोजी एकरकमी रक्कम जमा केली, तर ती 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते. सध्या किसान विकास पत्रावर वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याज मिळत आहे.

इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्र (KVP) ची सुविधा देशातील 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. तुम्ही यापैकी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र खरेदी करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करण्याचीही सुविधा आहे. म्हणजेच काही कारणास्तव तुमचे शहर बदलले तर तुम्ही ते नवीन शहरातील जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करू शकता.

ही योजना कोणत्याही FD पेक्षा जास्त परतावा देते. यासाठी मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे, परंतु गरज भासल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक त्यापूर्वीच कॅश करू शकता.

या योजनेत एकच अट आहे की, ती 30 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसह येते. म्हणजेच, अडीच वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुम्ही किसान विकास पत्र कधीही रोखू शकता.

किसान विकास पत्रामध्ये पैसे गुंतवण्याचा आणखी एक फायदा आहे. ही योजना कर सूट देखील प्रदान करते. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, किसान विकास पत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करातून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही किसान विकास पत्राचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सिंगल व्यतिरिक्त संयुक्त खाते उघडण्याचाही पर्याय आहे.

ही एकवेळ गुंतवणूक योजना आहे, म्हणजेच दर महिन्याला किंवा दरवर्षी त्यात पैसे टाकण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता, गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकावेळी कितीही रक्कम गुंतवू शकता. ही योजना 1988 मध्ये सुरू झाली, आधी फक्त शेतकरीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते, पण नंतर ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.