५ वर्षांपर्यंत दर वर्षी मिळणार २०००० रुपये, पाहा पोस्ट ॲाफिसच्या ‘या’ स्कीमचे जबरदस्त फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 09:02 AM2024-07-17T09:02:37+5:302024-07-17T09:09:38+5:30

Senior Citizen Saving Scheme: ही योजना सरकारद्वारे चालवली जाते आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत त्यावर जास्त व्याज मिळतं. इथे तुम्ही तुमचे निवृत्तीचे पैसे गुंतवून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवू शकता.

Senior Citizen Saving Scheme: निवृत्तीनंतर जर आरामाचं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला मोठ्या फंडाची गरज भासते. यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकीची गरज आहे. दीर्घकाळात थोडी थोडी करून तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत मोठा फंड जमा करू शकता. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी विशेषत: वृद्धांसाठी आहे.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) असं या योजनेचं नाव आहे. ही योजना सरकारद्वारे चालवली जाते आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत त्यावर जास्त व्याज मिळतं. इथे तुम्ही तुमचे निवृत्तीचे पैसे गुंतवून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीमची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यात १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे. यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळेल आणि निवृत्तीनंतर पैशांची चिंता राहणार नाही. हा प्लॅन ५ वर्षांसाठी उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना घेता येईल. जर तुम्ही वयाच्या ५५ ते ६० व्या वर्षी व्हीआरएस (वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम) अंतर्गत निवृत्त झाला असाल तर तुम्ही हे खाते उघडू शकता. संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारीही वयाच्या ५० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे खातं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही उघडू शकता.

ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एससीएसएस खातं उघडू शकतात. खातं उघडण्यासाठी कमीत कमी १००० रुपये जमा करणं आवश्यक आहे. तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करू शकता. तुम्हाला पैसे १००० रुपयांच्या पटीत जमा करता येतील.

या योजनेत तुम्हाला वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळतं. जर एखाद्या व्यक्तीनं ३० लाख रुपये जमा केले तर त्याला वार्षिक २.४६ लाख रुपये म्हणजेच दरमहा सुमारे २०,००० रुपये व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस) हा वृद्धांसाठी उत्तम पर्याय आहे.

यामुळे त्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळतं आणि त्यांच्या आर्थिक गरजा भागतात. ही योजना वृद्धांना आर्थिक सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करते, ज्यामुळे ते त्यांच्या जीवनाचा आनंद घेता येणंही शक्य आहे.