चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:48 AM2024-05-11T09:48:51+5:302024-05-11T09:52:21+5:30

कोट्यधीश बनण्यासाठी लागते कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवचापासून कमाईचं नवं साधन शोधलं. या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोस

मारियानं २०१९ मध्ये थेंगा कोको नावाच्या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

२०१९ मध्ये मारिया कुरियाकोस यांनी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात नारळाचे कवच गोळा करण्यास सुरुवात केली. मारियाने हे कवच चांगल्यारितीने स्वच्छ केले. त्यानंतर त्यावर सँडपेपरचा वापर करून त्याचा पृष्ठभाग अतिशय सुबक केला.

नारळाची जी कवच फेकून देण्यात आली होती त्यातून टिकाऊ, स्टायलिश आणि पर्यावरणपूरक वाडग्यात रुपांतर करण्यात आले. मारिया यांच्या या प्रयोगाने आजच्या घडीला जवळपास १ कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल असलेला हा मोठा उद्योग बनला आहे.

नारळाच्या कवचाचा उपयोग कचऱ्यातून टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरणासाठी चांगले आणि हस्तनिर्मित घरगुती वापरासाठी तयार होणाऱ्या उत्पादनासाठी करण्यात आला. मारियाने या व्यवसायाला थेंगा कोको असं नाव दिलं आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होता.

नारळाचं झाड खास असते. त्याला कल्पवृक्षही म्हटलं जाते. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगाचा असतो. मग ते झाडाचे खोड, फळे, मुळे असोत, मारिया यांना या उपयोगी भागातून प्रयोगशील आयडिया सुचली. २०१६ मध्ये मारियानं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती स्पेनला गेली.

मारियानं २०१७ मध्ये मुंबईच्या एऑन हेविट इथं सल्लागार म्हणून काम केले. नोकरीपेक्षा व्यवसाय बरा हा विचार तिच्या मनात कायम होता. पर्यावरण, समाजाला फायदा होईल असं काहीतरी वेगळे करण्याचं तिच्या डोक्यात होतं. त्यानंतर १ वर्षात मारिया यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मैना महिला फाउंडेशनचं काम सुरू केले.

मारियानं सुरु केलेल्या उद्योगात केरळमधील विविध क्षेत्रातील शेतकरी आणि कुशल कामगारांचे नेटवर्क आहे. त्यात कोट्टायम, कोंडुगल्लूर, मेट्टुपालयम आणि एलेप्पी यांचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीत ३० हून अधिक लोक काम करतात त्यातील ८० टक्के महिला आहेत.

या महिला कामगारांना दरमहिना २० ते २५ हजार पगार आहे. चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मारिया यांच्या कंपनीनं तयार केलेल्या उत्पादनांची मागणी आहे. त्यासोबतच डेनमार्क,स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या देशातही भरपूर मागणी आहे. अलीकडेच देशातंर्गत मागणीपेक्षा परदेशातील मागणी वाढली आहे.