Train News: रेल्वेतील रिझर्व्ह सीट दुसऱ्याने बळकावली तर काय कराल? 15 मिनिटांत टीसी धावत पळत येतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:52 PM2022-05-26T12:52:47+5:302022-05-26T12:59:22+5:30

Train Madad App: जनरल तिकिटावर अनेकदा पॅसेंजर आरक्षित डब्यामध्ये घुसलेले असतात. अनेकदा तर सीट किंवा बर्थच या लोकांनी कब्जामध्ये घेतलेला असतो. ज्याने रिझर्व्हेशन करून जादा पैसे मोजले आहेत, तो बिचारा कोनाड्यात पाय बांधून बसलेला असतो.

अनेकदा रेल्वेमध्ये ही मोठी गर्दी असते. सर्वांनाच कुठे ना कुठे जायचे असते. जनरल तिकिटावर अनेकदा पॅसेंजर आरक्षित डब्यामध्ये घुसलेले असतात. अनेकदा तर सीट किंवा बर्थच या लोकांनी कब्जामध्ये घेतलेला असतो. ज्याने रिझर्व्हेशन करून जादा पैसे मोजले आहेत, तो बिचारा कोनाड्यात पाय बांधून बसलेला असतो.

युपी, बिहारमध्ये तर त्यापेक्षा भयानक स्थिती असते. हे अवैध प्रवासी एसीच्या डब्यांमध्येही घुसलेले असतात. टीसींना पैसे देऊन हे लोक बर्थ मिळवितात आणि पुढच्या स्टेशनवर जो अधिकृत प्रवासी चढतो त्याला त्याच्याच सीटवर बसूही देत नाहीत. मग तक्रार कोणाकडे करायची.

रात्री अपरात्री आपल्या बॅगा, बायका, मुले घेऊन टीसीला शोधत फिरायचे का? की मुजोर लोकांमुळे सीटवर न बसता खाली बसायचे? नाही... तुम्ही पैसे मोजलेत, तुम्हाला त्या सीटवर बसण्याचा किंवा झोपण्याचा हक्क आहे. त्यामुळे भांडत न बसता एक काम करायचे, टीसी तुम्हाला शोधत शोधत येतील. हा किस्सा वैशाली एक्स्प्रेसमध्ये घडला आहे.

रात्री दोन वाजता चढलेल्या प्रवाशाने विनंती करूनही बेकायदा घुसलेले प्रवासी जितेंद्रला त्याची सीट देत नव्हते. अखेर सहप्रवाशाने त्याला Rail Madad अॅप डाऊनलोड करायला सांगितले. या अॅपवरून पीएनआर नंबरद्वारे तक्रार दाखल करण्यात आली.

यावर केलेली एक तक्रार रेल्वेच्या आरपीएफ डिपार्टमेंटकडे गेली. दुसरी तक्रार रेल्वे मिनिस्ट्रीकडे करण्यात आली. रेल्वे मिनिस्ट्रीला केलेल्या तक्रारीत कानपूरमध्ये चढलेल्या प्रवाशाला टीटीई दिसला नाही, असे म्हटले गेले.

यानंतर सूत्रे वेगाने हलली. केवळ १५ मिनिटांत डोळे चोळत चोळत एक नव्हे तीन टीटीई जितेंद्रला शोधत तिथे आले. अनधिकृत कब्जा केलेल्या प्रवाशांकडून जितेंद्रचा बर्थ रिकामा करून घेण्यात आला. जितेंद्रला बर्थवर जागा मिळाली. टीटीई टीम इंचार्जने जितेंद्रला त्या तक्रारीवर सोडविल्याचा रिपोर्ट देण्याची विनंती केली. तसेच आपला फोन नंबर देत कोणताही त्रास झाला तर फोन करण्यास सांगितले.

पुढचा किस्सा अजून बाकी आहे. त्या बेकायदा घुसलेल्या प्रवाशांचे पुढे काय झाले.... ट्रेन पुढील स्टेशनवर पोहोचताच त्या डब्यात आरपीएफची एक टीम आली. त्यांनी जितेंद्रचा जबाब घेतला आणि बेकायदा पॅसेंजवर कारवाई केली.

तुम्हाला माहिती आहेच की, रात्री १० नंतर रेल्वे प्रवाशांना टीटीई देखील झोपेतून उठवू शकत नाही. मग या प्रकारामुळे या प्रवाशांची झोपमोड झाली. त्यामुळे आरपीएफने अधिकृत पॅसेंजरला त्याची सीट दिली नाही, सह प्रवाशांची झोपमोड केली आदी गुन्ह्यांखाली कारवाई केली आणि त्या प्रवाशांना खाली उतरविले.

तुमच्या रिझर्व्हड सीटवर कोणी बसला असेल आणि तो जर जागा खाली करत नसेल तर त्याची तक्रार टीटीईकडे करावी लागते. टीटीई सापडला नाही तर ट्रेन मॅनेजरशी बोलले पाहिजे. त्यालाही तो प्रश्न सोडविता आला नाही तर रेल्वेची वेबसाईट मदद https://railmadad.indianrailways.gov.in/madad/final/home.jsp वर तक्रार नोंदवावी. किंवा १३९ वर फोन केला तरी चालेल.