Vodafone-Idea नं लायसन्स फी भरली; पाहा अजून किती आहे कंपनीवर कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:14 PM2021-08-19T17:14:23+5:302021-08-19T17:18:13+5:30

Vodafone Idea : सध्या कंपनीवर आहे मोठ्या प्रमणात कर्ज. कंपनीनं पहिल्या तिमाहीसाठी लायसन्स शुल्क भरल्याची दिली माहिती.

Vodafone Idea Limited नं गुरूवारी आपण २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहित लायसन्सची रक्कम भरली असल्याची माहिती कंपनीनं दिली.

"VIL नं पहिल्या तिमाही २०२१-२२ साठी आपल्या लायसन्स शुल्काची रक्कम भरली आहे," असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी कंपनीनं जून महिन्यात भरलेलं लायसन्स शुल्क १५० कोटी रूपये कमी होतं, असं वृत्त समोर आलं होतं.

सध्या व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आपल्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडत असल्याचं दिसून येतं आहे. कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असून पहिल्या तिमाहीचं उत्पन्न आणि शनिवारी घोषित करण्याचं आलेल्या जून तिमाहीतील परिचालन मॅट्रिक्सनं विश्लेषकांनाही निराश केलं.

दूरसंचार कंपनीद्वारे जारी करण्यात आलेल्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार जून २०२१ पर्यंच VIL वर एकूण निव्वळ कर्ज १,९१,५९० कोटी रूपये इतकं आहे.

या रकमेममध्ये स्पेक्ट्रमच्या शुल्कापायी द्यावे लागणारे १,०६,०१० कोटी रूपयांचा आणि एजीआरपायी देण्याची रक्कम ६२,१८० कोटी रूपये यांचा समावेश आहे.

सध्या कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीमुळे बुधवारीही शेअर्सची दर गडगडताना दिसले. तरी मंगळवारच्या तुलनेत ते अधिक होते.

बुधवारी व्होडाफोन आयडियाच्या शेअरची किंमत ६.४५ रूपये इतकी होती. मंगळवारच्या तुलनेत यामध्ये १२.३७ टक्क्यांची वाढ जिसून आली. सध्या कंपनीचं बाजारमूल्य १८,५३४.३३ कोटी रूपये इतकं आहे.

आदित्य बिर्ला समूहाचे (Aditya Birla Group) अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाचे (Vodafone Idea) बिगर-कार्यकारी संचालक आणि बिगर-कार्यकारी अध्यक्षपदाचा यापूर्वी राजीनामा दिला होता.

आदित्य बिर्ला समूहाकडून हिमांशु कपाडिया यांची बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं व्होडाफोन-आयडिया लिमिटेडनं सांगितलं होतं. व्होडाफोन-आयडिया सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहे, अशा वेळी हे बदल करण्यात आले होते.

कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये २५ हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली होती. तथापि, कोणीही गुंतवणूकदार समोर न आल्यामुळे ती बारगळली. त्यामुळे कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारला साकडं घातलं होते.