Shraddha Walker Murder Case: मोठी अपडेट! आफताबने श्रद्धाचे शीर फेकलेले ठिकाण सापडले; दिल्ली पोलीस तलावाचे पाणी उपसताहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 05:38 PM2022-11-20T17:38:18+5:302022-11-20T17:48:32+5:30

Shraddha Walker Murder Case Aftab Poonavala: श्रद्धाला ऋषिकेशमध्येच मारायचे होते. परंतू आफताबला पकडले जाण्याची भीती वाटली. त्यामुळे तो घाबरला आणि त्याने दिल्लीत परतल्यावर खून केला.

वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आज नवी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहेत. श्रद्धाचा लिव्ह इन बॉयफ्रेंड आफताब पुनावाला यांने तिचे ३५ तुकडे केले होते. ते फ्रीजमध्ये ठेवून तो १८ दिवस हे तुकडे दिल्लीच्या निर्जन परिसरात, जंगलात नेऊन टाकत होता. पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाची हाडे गोळा करत आहेत. परंतू, तीन-चार महिने झाल्याने पोलिसांना ते सापडणे कठीण होऊन बसले आहे.

श्रद्धाचे शीर आफताबने एका तलावात टाकले होते. दिल्ली पोलीस आणि महापालिकेची टीम आज दिवसभर एक मोठे तलाव रिकामे करण्याच्या कामी लागली आहे. छतरपुर एनक्लेव येथील या तलावात आफताबने श्रद्धाचे शीर फेकले होते. आता ते शोधण्यासाठी पोलीस हे तलाव उपसत आहेत. सर्व पाणी काढून टाकल्यानंतर पोलिसांना श्रद्धाचे मुंडके हाती लागण्याची आशा वाटत आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेले हत्यार देखील दिल्ली पोलीस शोधत आहेत. आफताबने ते कचरा कुंडीत टाकल्याचे म्हटले आहे. तिचे कपडे कुठे टाकले ते देखील पोलीस शोधत आहेत. पोलीस आता शेजारच्या राज्यातही आफताबने कुठे कुठे भेट दिलेली तिथे शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे १७ हाडांचे तुकडे सापडले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हाडांचे तुकडे पाहून फॉरेन्सिक एक्स्पर्टचे म्हणणे आहे की ते मानवाचेच आहेत. ती हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आता एक मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी डीएनए टेस्टिंगही केली जात आहे. या हाडांमध्ये जांघेतील हाड देखील आहे. या हाड़ांवर धारधार हत्याराने कापल्याचेही दिसत आहे.

दिल्ली, महाराष्ट्र तर चौकशीच्या फेऱ्यात आहेच परंतू अन्य तीन राज्यांत देखील तपास केला जात आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये दिल्ली पोलीस जात आहेत. श्रद्धा खून प्रकरणाचा हिमाचलशी मोठा संबंध आहे. त्यामुळे पोलिसांनी आफताबला तेथे नेऊन तपास करण्याची तयारी केली आहे.

मे महिन्यात श्रद्धाची हत्या झाली होती आणि आफताब 6 एप्रिलला कुलूमध्ये श्रद्धासोबत होता. तेथे दोघेही मणिकरणच्या तोश गावात राहिले. त्याचवेळी हिमाचलच्या दौऱ्यावर आफताब बद्री नावाच्या व्यक्तीला भेटला, ज्याने त्याला दिल्लीतील मेहरौली येथे राहण्यास मदत केली. तो देखील पोलिसांच्याही रडारवर आहे.

आफताब आणि श्रद्धा उत्तराखंडमधील ऋषिकेशलाही गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. श्रद्धाला ऋषिकेशमध्येच मारायचे होते, असे सूत्रांनी सांगितले. परंतू आफताबला पकडले जाण्याची भीती वाटली. त्यामुळे तो घाबरला आणि त्याने दिल्लीत परतल्यावर खून केला.

श्रद्धाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या करवतीचा पोलिसांनी गुरुग्रामपर्यंत शोध घेतला आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली करवत गुरुग्राममधील त्याच्या कार्यालयामागील झुडपात कुठेतरी फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचाच शोध घेत शनिवारी पोलिसांनी मेटल डिटेक्टरचा वापर करून शोधमोहीम राबवली होती.

सहा महिन्यांपुर्वीच हत्या केल्याने तोवर आफताबने सर्व पुरावे नष्ट केले आहेत. त्यामुळे आता आफताबचा गुन्हा कसा सिद्ध करायचा हे दिल्लीपोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सोमवारी आफताबची नार्को अॅनालिसिस टेस्ट होणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांनी ४० प्रश्नांची यादी तयार केली आहे.