आईचा दुसऱ्यावर जडला जीव, पण लग्नात मुलाचा अडथळा; अडीच लाखांची सुपारी देऊन पोटच्या पोरालाच संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 06:57 PM2024-07-22T18:57:06+5:302024-07-22T19:04:23+5:30

गळा आवळून नदीम या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता.

आई आणि मुलाचं नातं जगात सर्वाधिक पवित्र मानलं जातं. मात्र या नात्यालाही काही ठिकाणी काळिमा फासली जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव इथं घडली आहे. उद्योजक असलेल्या तरुणाच्या हत्येसाठी त्याचे आईनेच सुपारी दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.

कानपूर-लखनौ हायवेवर उन्नाव येथील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृत्यूप्रकरणात आता धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

गळा आवळून नदीम या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी मृत युवकाच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी विहिरीजवळून बाईक ताब्यात घेतली होती.

या हत्येप्रकरणी पोलिसांना पहिला संशय नदीमच्या पत्नीवर होता. त्यामुळे त्याची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना नदीमच्या आईबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोर उलगडत गेले.

पोलिसांनी नदीमची आई आरफा बेगमची चौकशी केली. यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आरफा बेगम हिची अजमेर येथील हसन अली खान यांच्यासोबत जवळीक असल्याचं समोर आलं. त्या दोघांची लग्न करण्याची इच्छा होती. मात्र नदीमच्या विरोधामुळे त्यांना लग्न करता येत नव्हतं.

दरम्यान, प्रियकरासोबत लग्न करण्यास येत असलेल्या अडथळ्यामुळेच आरफा बेगम हिने अडीच लाख रुपयांना त्याच्या हत्येची सुपारी दिली.

सुपारी दिलेल्या गुन्हेगारांनी नदीमचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी आता अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.