भयानक! दैवी शक्ती मिळवण्यासाठी तरुणाने स्वतःचे शीर धडापासून केले वेगळे; थरकाप उडवणारा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 09:50 AM2022-12-17T09:50:54+5:302022-12-17T10:08:04+5:30

UP Crime News : गेल्या 10 डिसेंबरला गधीगांव हायवेच्या बाजूला 37 वर्षीय व्यक्तीचा शीर कापलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडल्याची घटना गावात आगीसारखी पसरली होती.

तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकून पुन्हा जिवंत होण्यासाठी एका व्यक्तीने आपलीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणाला विश्वास होता की, देवी त्याला पुन्हा जिवंत करेल आणि त्याला जास्त शक्तीशाली बनवेल. ही घटना यूपीच्या प्रयागराजमधील असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गेल्या 10 डिसेंबरला गधीगांव हायवेच्या बाजूला 37 वर्षीय व्यक्तीचा शीर कापलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडल्याची घटना गावात आगीसारखी पसरली होती. पोलिसांनी तपास केला तेव्हा या रहस्यमय मृत्यूबाबत खुलासा झाला.

पोलिसांनुसार, मृत आशीष दीक्षित साधारण 6 महिन्यांआधी हरिद्वारमध्ये गंगा स्नान दरम्यान नीतीश सैनी याला भेटला होता. नीतीश एक साधारण परिवारातील होता. तो त्याच्या भविष्याबाबत आणि परिवाराबाबत चिंतेत राहत होता.

यादरम्यान आशीषने पूजा-पाठ आणि देवीच्या शक्तीच्या माध्यमातून भविष्य चांगलं करण्याचं आश्वासन नीतीशला दिलं. त्याच्या बोलण्याने नीतीश प्रभावित झाला होता. आशीषचा पूजा-पाठ पाहून त्याला विश्वास बसला की, आता त्याचं भविष्य चांगलं होणार आहे.

नंतर आशीष आणि नीतीश हरिव्दारमध्ये एक भाड्याचं घर घेऊन सोबत राहू लागले. इतकंच नाही तर आशीषने त्याची नोकरीही सोडली होती. त्याला पूर्ण विश्वास होता की, देवीच्या शक्तींच्या माध्यमातून एक दिवस त्याची परिस्थीती चांगली होईल.

आशीष नीतीशचा सगळा खर्चही करत होता आणि नेहमी सोबत राहत होता. अनेकदा परिवारातील लोक नाराज झाले आणि याचा विरोधही केला होता. तेच नीतीश आणि आशीष सोबत हरिव्दारहून 8 डिसेंबरला प्रयागराजला आले आणि देवी विंध्यवासिनीचं दर्शन घेण्यासाठी गेले.

दर्शन घेतल्यानंतर आशीष नीतीशला म्हणाला की, मला सिद्धी मिळवायची आहे आणि तू जर मला मारलं तर मला सिद्धी प्राप्त होईल. मी पुन्हा जिवंत होणार. जिवंत झाल्यावर दैवी शक्ती प्राप्त करून मी तुझं जीवन बदलणार. आशीष नीतीशला यूट्यूबवर महाभारतमध्ये बर्बरीक आणि ऋषिच्या कथा दाखवत होता. ज्यात एक व्यक्ती आपलं शीर कापतो आणि त्यानंतर त्याला दैवी शक्तीच्या माध्यमातून पुन्हा जिवंत होतो.

आशीष नीतीशला म्हणाला की, पूजा-पाठ करून मी जेव्हा परत येईन तेव्हा मला हलवून बघ. जर माझ्या शरीरात काही हालचाल झाली नाही तर धारदार शस्त्राने माझं शीर धडापासून वेगळं करशील आणि जे रक्त निघेल ते आपल्या कपाळावर लावून अभिषेक करशील. नंतर शस्त्र आणि पूजेचं साहित्य गंगेच्या किनारी गाडशील. त्यानंतर तू प्रयागराज स्टेशनला जाशील. मी तिथे एका तासाने पोहोचेल. जर मी तिथे पोहोचलो नाही तर तू तिथून निघून जा. मी देवी कामाख्याजवळ जिवंत होऊन त्यांचं दर्शन घेऊन तुला हरिद्वारमध्ये भेटतो. नीतीशने आशीषचं शीर कापलं आणि तो हरिद्वारला गेला.

पकडण्यात आलेला आरोपी नीतीशने पोलिसांना सांगितलं की, यादरम्यान आशीष दारू प्यायला होता आणि काहीतरी औषधही घेतलं होतं. नंतर तो कपडे काढून झोपला. थोड्या वेळाने त्याच्या शरीरात काहीच हालचाल झाली नाही.

नीतीशने आशीषला हलवून बघितलं. शरीरात काहीच हालचाल दिसली नाही तेव्हा धारदार शस्त्राने त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. आशीषने सांगिल्याप्रमाणे नीतीशने पूजेचं साहित्य गंगे किनारी पुरलं. स्टेशनवर एक तास वाट पाहिल्यानंतर नीतीश हरिद्वारला निघून गेला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि नीतीशला अटक केली गेली.