Health Tips: आंघोळीचे 'सात' नियम पाळाल तर 'शतायुषी' व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 07:00 AM2024-08-21T07:00:00+5:302024-08-21T07:00:02+5:30

Health Tips: काही लोक काकस्नान असावे तशी काही मिनिटांत आंघोळ उरकतात, तर काही जण शाही स्नान करावे अशागत तासभर आंघोळ करतात. आंघोळ किती वेळ करतो हे महत्त्वाचे नसून ती कशी करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याचे सात नियम सगळ्यांनी पाळायलाच हवेत. तुम्ही म्हणाल आंघोळ करण्यासंबंधी कसले आलेत नियम? तर लक्षात घ्या, आंघोळीचा (Bath Tips) आणि आरोग्याचा (Health Tips) परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. तो दृढ करण्यासाठी वाचा दिलेली नियमावली!

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत!

अंगावर पाणी घेताना बेंबीवर पाणी घालावे, ७७,००० नाड्या केंद्रित असतात. त्या ऍक्टिव्ह झाल्यावर मग डाव्या खांद्यावर पाणी घालावे, शरीर शिथिल होते आणि आंघोळीसाठी तयार होते.

साबणाचा अति वापर त्वचा रुक्ष बनवतो. उटणे, बेसन लावून आठवड्यातून दोनदा आंघोळ करावी. त्यामुळे कोणत्याही मौसमात त्वचा मऊ राहते आणि त्वचेचे रक्षण होते.

अति तापलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिणझिण्या येतात, मेंदूवर ताण पडतो. शरीराची त्वचा खराब होते, आजारांना आमंत्रण मिळते. अंघोळीसाठीपाणी कोमट हवे आणि हिवाळा सोडला तर अन्य ऋतूमध्ये गार पाण्याने अंघोळ करणे चांगले.

आंघोळ झाल्यावर घशाला कोरड पडत असेल किंवा सर्दी वाटत असेल तर तोंडात पाणी भरा, डोळे मोठे करा. डोळे ताणले गेले की चेहऱ्याचे स्नायू मोकळे होतात आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही. ही प्रक्रिया अंघोळीनंतर २-४ वेळा करावी. गायकांसाठी हा उत्तम प्रकार आहे.

व्यायाम झाल्या झाल्या अंघोळ करू नये. घाम वाळू द्यावा. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होऊ द्यावे. अर्ध्या तासाने अंघोळ करावी.

जेवल्यावर किंवा काही खाल्यावर आंघोळ करू नये, आंघोळ झाल्यावर खावे. ब्लोटिंग, गॅस, अपचन होते. जठराग्नी बिघडतो. पचन क्रिया बिघडते. पूर्वी लोक अंघोळ झाल्याशिवाय खात नसत. तीच योग्य पद्धत आहे.

आंघोळ झाल्यावर पाणी प्यावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते.