Sanath Jaisurya: भारत आमचा 'मोठा भाऊ', जयसूर्याने मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:22 AM2022-04-07T10:22:56+5:302022-04-07T10:38:28+5:30

श्रीलंकेत, आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडण्याची मागणी करताना मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरु निषेध करत आहेत.

आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka Crisis) परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. एकीकडे राजपक्षे सरकार सातत्यानं टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले आहे.

श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला असून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री आणि क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारताचे आभार मानले होते. आता, माजी फलंदाज सनथ जयसुर्यानेही भारत हा आमचा 'मोठा भाऊ' असल्याचे म्हटले आहे.

अर्जुना रणतुंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. भारताने श्रीलंकेला मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार तर मानलेच पण भारत हा श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणूनही उल्लेख केला.

आता जयसुर्यानेही भारत हा मोठा भाऊ असल्याचे सांगत भारताचे आभार मानले आहेत. तर, श्रीलंकेतील विदारक परिस्थितीचे वर्णन करताना सरकारविरुद्ध आपला आवाज उठवला आहे.

गॅस संपलाय, लाईटही गेलीय, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीला विद्यमान सरकारच जबाबदार आहे. वेळीच परिस्थितीवर नियंत्रण न आल्यास, ही आपत्तीजन्य परिस्थिती बनेल, असेही जयसुर्याने म्हटले आहे.

आपल्या शेजारील देश आणि मोठा भाऊ म्हणून भारताने नेहमीच आम्हाला मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारी आहोत.

आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही. पण, भारत आणि इतर देशांच्या मदतीने आम्ही यातून बाहेर पडू, असा आशावाद सनथ जयसूर्याने व्यक्त केला.

दरम्यान, श्रीलंकेत, आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडण्याची मागणी करताना मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरुन निषेध करत आहेत.

सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना श्रीलंकेला करावा लागत आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅससाठी लांबच्या लांब रांगा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित होत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारमध्येही खळबळ उडाली आहे.

जयसूर्या आणि रणतुंगा यांनी श्रीलंकेतील सरकारवर टीका केली असून भारत सरकारचे कौतूक करत आभार मानले आहेत.