सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:26 PM2022-01-05T12:26:30+5:302022-01-05T12:37:01+5:30

WHO on Omicron: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

WHO on Omicron: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. झपाट्यानं प्रसार होत असलेल्या ओमायक्रॉननंही (Omicron Variant) अनेक देशांसमोरील चिंता वाढवली आहे.

ओमायक्रॉनचाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) Omicron बाबत एक नवीन इशारा जारी केला आहे. "ओमायक्रॉन व्हेरिअंटदरम्यान सर्दी आणि खोकला एक सामान्य आजार मानण्याची चूक करू नका. ओमायक्रॉनमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो," असं त्यांनी म्हटलंय.

"आता सतर्क राहणं आवश्यक आहे. ओमायक्रॉनचं वाढतं संक्रमण विपरीत प्रभाव टाकत आहे. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिअंटपेक्षा थोडा कमी घातक आहे. परंतु हा मृत्यूचं कारण ठरू शकतो," अशी प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ आपात्कालिन अधिकारी कॅथरिन स्मॉसवूड यांनी सांगितलं.

"सध्या आपण धोकादायक टप्प्यात आहोत. पश्चिम युरोपमध्ये आपण संसर्गाच्या दरात मोठी वाढत पाहत आहोत. याचा पूर्ण प्रभाव आतापर्यंत स्पष्ट नाही," असंही त्यांनी सांगितलं.

डेल्टा व्हेरिअंटच्या संसर्गादरम्यानच ओमायक्रॉन व्हेरिअंटचा संसर्ग वाढणं हा रुग्णसंख्येची त्सुनामी आणण्याची शक्यता दाखवत असल्याची मला चिंता आहे. ओमायक्रॉशी संबंधित जोखीम अधिक आहे, असं मत यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक अधनोम घेब्रेयसस यांनी व्यक्त केलं होतं.

देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर गेली आहे. सध्या देशातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.

दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील वाढत असून एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २१३५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये अधिक आहेत.

महाराष्ट्रात ६५३ तर दिल्लीमध्ये ४६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर २१३५ रुग्णांपैकी ८२८ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. केरळ, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, ओ़डिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.

ल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (५ जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ५८,०९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ५३४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४,८२,५५१ वर पोहोचला आहे.

देशातील सध्या २,१४,००४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,४३,२१,८०३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.