भारतातील एक 'असं' गाव जिथं लोक अनवाणी फिरतात; चप्पल बूट न घालण्यामागची प्रथा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:56 PM2024-09-03T13:56:40+5:302024-09-03T14:02:57+5:30

भारतीय घरांमध्ये बहुतांश लोक विना चप्पल घराच्या आतमध्ये वावरतात. लोक चप्पल- बूट घराबाहेर काढतात. बाहेर रस्त्यावर फिरताना कुठेही तुम्हाला क्वचितच कुणी विना चप्पल बुटांचे दिसतील. मात्र दक्षिण भारतात एक असं गाव आहे ज्याठिकाणचे लोक कधीच चप्पल बूट घालत नाहीत.

या गावातील लोक कधीही घराबाहेर पडताना चप्पल घालत नाहीत. गावात चप्पल बूटांवर बंदी आहे का असा प्रश्न विचारला जातो परंतु या गावातील या प्रथेमागे रंजक कहाणी आहे. नेमकं या गावातील लोक बूट चप्पल का घालत नाहीत हे जाणून घेऊया.

२०१९ च्या बीबीसी रिपोर्टनुसार, या छोट्या गावाचं नाव अंडमान आहे जे तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून ४५० किमी अंतरावर आहे. या गावात १३० कुटुंब राहतात. याठिकाणी बहुतांश लोक शेतकरी आणि शेतात मजुरी करणारे आहेत.

गावातील केवळ वृद्ध अथवा आजारी व्यक्तीच चप्पल बूट परिधान करू शकतो बाकी इतर कुणीही गावात चप्पल बुटात फिरत नाही. बऱ्याचदा अति उष्णतेमुळे गावातील काही लोक जमिनीवरील चटक्यापासून वाचण्यासाठी चप्पल घालतात.

गावातील शाळकरी मुलेही बूट चप्पल न घालताच शाळेत जातात. इतकेच नाही तर जसं एखादी बॅग हाती घेतली असावी तसे काही जण हातात चप्पल बूट घेऊन चालताना दिसतात. मग यामागे कारण काय असावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचे उत्तर बघा

गावात अशी कथा सांगितली जाते की, या गावाचं संरक्षण मुथ्यालम्मा नावाची एक देवी करते जिच्या सन्मानासाठी येथील लोक चप्पल बूट घालत नाहीत. ज्याप्रकारे लोक मंदिरात चप्पल बूट घालून प्रवेश करत नाही तसं इथली लोक हे गाव मंदिरच असल्याचं मानतात.

या गावात विना चप्पल बूट चालण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे. कुणीही इथं जबरदस्ती केली नाही. इथले लोक केवळ एका प्रथा परंपरेचं पालन करतात. जर ही प्रथा मान्य असेल तर चांगले, परंतु जर कुणाला मान्य नसेल तर अशांवर कुठलीही जबरदस्ती केली जात नाही.

परंतु खूप वर्षापूर्वी लोकांमध्ये असं बोललं जायचं की, जर या नियमांचे पालन केले नाही तर गावात एक रहस्यमय आजार पसरेल आणि त्यातून सर्वांचा मृत्यू होईल. मार्च एप्रिलमध्ये गावकरी देवीची पूजा करतात. याठिकाणी ३ दिवस यात्रेचे आयोजन केले जाते.

तामिळनाडूतील आणखी एक कलिमायन नावाचं गाव आहे जिथं चप्पल बूट घातले जात नाहीत. जर कुणीही या गावात चप्पल बूट घालून दिसला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. प्रसिद्ध मदुराईपासून २० किमी अंतरावर हे गाव आहे.

याठिकाणी अपाच्छी नावाची देवी गावाचे संरक्षण करते, देवीच्या आस्थेमुळे येथील लोक गावच्या सीमेत चप्पल बूट घालत नाहीत. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. जर कुणाला बाहेर जायचं असेल तर ते हातात चप्पल किंवा बूट घेऊन गावची सीमा ओलांडल्यानंतर ते पायात घालतात.