CoronaVirus Live Updates : चिंताजनक! उन्हाळ्यात पुन्हा पसरू शकतो कोरोना; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:13 PM2022-03-07T16:13:26+5:302022-03-07T16:35:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

IIT कानपूरच्या काही संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यास अहवालाद्वारे जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजादरम्यान, आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात आर्द्रता वाढल्याने व्हायरस आणखी पसरणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे.

कोरोना चाचणी, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग कमी होत आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ आता चौथ्या लाटेबाबत भाष्य करत आहेत.

आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी चौथी लाट 22 जूनच्या आसपास येण्याची आणि 24 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनीही उन्हाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. टास्क फोर्सचे डॉ.शशांक जोशी आणि डॉ.राहुल पंडित यांनी तसे संकेत दिले आहेत.

डॉ. शशांक जोशी यांच्या मते, पाश्चात्य देशांमध्ये थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होतो, तर भारतात उन्हाळ्यामध्ये. हाच ट्रेंड पहिल्या दोन लहरींमध्ये दिसून आला आहे. ते म्हणाले की, उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता वाढली की व्हायरस वाढतात असे निदर्शनास आले आहे.

डॉ. राहुल पंडित यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उन्हाळ्यातच कोरोनाचा उच्चांक होता. थंडीच्या मोसमात तिसऱ्या लाटेने दार ठोठावले असले तरी मुंबईत थंडीचे प्रमाण फार कमी आहे असं म्हटलं आहे.

डॉ शशांक जोशी यांच्या मते दोन लाटेचा ट्रेंड पाहता या उन्हाळ्यात लोकांनी काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लोक बेफिकीर झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ते मास्क वगैरे पाळत नाहीत, त्यामुळे दोन लहरींचा ट्रेंड पाहता त्यांनी लोकांना मास्क इत्यादी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

आपण प्रत्येक नवीन लाट टाळू शकतो. मात्र, त्यांनी कानपूर आयआयटीच्या चौथ्या लाटेचा अंदाज निव्वळ अनुमान असल्याचे वर्णन केले आहे. यावर ठोस अभ्यास होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्षणी, नवीन प्रकाराबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.

डॉ. राहुल पंडित यांनी बीएमसी पहिल्या लाटेपासूनच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा मागोवा घेत आहे. यावर अजूनही भर द्यायला हवा. आता जे रुग्ण सापडत आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा माग काढला पाहिजे असं म्हटलं आहे.

जेणेकरून कोरोना व्हायरसची साखळी तोडता येईल. कोरोना चाचणी आणि लसीकरणही कमी दिसत असल्याने ते वाढवण्यावर भर द्यावा, असंही ते म्हणाले. याद्वारे प्रत्येक लाट टाळता येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 446,721,728 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,020,582 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 379,869,871 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.