कोकणातील या गावात चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:21 PM2024-09-07T13:21:53+5:302024-09-07T13:28:18+5:30

Ganesh Mahotsav: गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये. कोकणात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी गणपतीचं आगमन झालं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांचा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये. कोकणात घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. 

या गावाचं नाव आहे कोईळ.  मालवण तालुक्यात असलेल्या या गावामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जात नाही. या गावात सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत मात्र यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही.

याचं कारण म्हणजे या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे. गावातील रहिवाशा्ंनी गावातील याच गणपतीचं पूजन करावं, असा दंडक येथे शेकडो वर्षांपासून पाळला जात आहे.  घरी गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये अनेक अडथळे येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. 

 या गावात अजूनही घरगुती गणपती आणला जात नाही. घरगुती गणपतीऐवजी गणेशोत्सवादरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावी राहणारे चाकरमानी गावात येतात. यावेळी गावच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. 

तसेच या गावातील ग्रामस्थ जसे घरी घरगुती गणपतीची पूजा करत नाहीत. तसेच येथील घरांमध्ये गणपतीच्या तसबिरीसुद्धा लावल्या जात नाहीत. घरांमध्ये इतर देवतांचे फोटो ठेवले जातात. तसेच वेळेप्रसंगी सत्यनारायणाची पूजाही होते. मात्र घरी गणपतीची पूजा होत नाही.  तसेच गावातील कुठल्याही मंगलप्रसंगी सर्वप्रथम या मोरयाला मान दिला जातो.