पोलंडमध्ये PM मोदी मराठीत का बोलले?, या देशाचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन; जाणून घ्या अभिमानास्पद इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 02:21 PM2024-08-22T14:21:06+5:302024-08-22T16:49:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ दिवसीय पोलंड दौऱ्यावर पोहचले. गेल्या ४५ वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. वॉर्सा येथे पोहचल्यानंतर मोदींनी कोल्हापूर स्मारकाला भेट देत तिथे छत्रपती राजघराण्याला अभिवादन केले. नेमके पोलंडमध्ये कोल्हापूर स्मारक कुणी उभारले, यामागचा इतिहास काय हे जाणून घेऊया.

हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन,कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिले. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.

यावेळी मोदींनी मराठीत भाषण करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील नागरिक आणि मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडच्या नागरिकांना व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत माणुसकी धर्म आचरणाला सर्वात जास्त प्राधान्य आहे. कोल्हापुरच्या राजघराण्यानं पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला होता.

दुसऱ्या महायुद्धावेळी महाराष्ट्रातील कोल्हापूर इथल्या एका छोट्या गावात ज्याचं नाव वळीवडे आहे तिथे पोलिश निर्वासितांना जगण्याची नवी आशा मिळाली. हजारो पोलिश मुले आणि नागरिक हे सर्वात मोठ्या संकटात अडकले होते. १९४२ आणि १९४८ मध्ये सोवियत दमनहून पळून आलेल्या ६ हजार पोलिश नागरिकांचे भारताने स्वागत केले. त्यात महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता.

या नागरिकांना युद्धामुळे जगण्याचं आव्हान निर्माण झालं होते. त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे राजा, भारत सरकार यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने या सर्व निर्वासितांना आश्रय दिला. वळीवडे येथे निर्वासितांची वस्ती बनवण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश अधिकारी यांच्यासोबत भारतातील कोल्हापूर संस्थानाचाही हातभार होता.

मुंबईपासून ५०० किमी अंतरावरील वळीवडे गावात अनुकूल हवामानामुळे पोलिश निर्वासितांच्या राहण्यासाठी निवडलं गेले. गावात विविध सुविधांसह एक पोलिश वस्तीच विकसित करण्यात आली होती. त्यात एक चर्च, एक सामुहिक केंद्र, अनेक शाळा, एक कॉलेज, एक पोस्ट ऑफिस, एक थिएटर यांचाही समावेश होता.

पोलिश नागरिक इथून गेल्यानंतर या सर्व वास्तू स्मारक म्हणून संरक्षित केल्या गेल्या. कोल्हापूरात एक कब्रिस्तान होतं, ते २०१४ नंतर पुन्हा उघडण्यात आले. हे त्या पोलिश व्यक्तींसाठी करण्यात आले ज्यांचा भारतात मृत्यू झाला होता आणि त्यांना इथं दफन करण्यात आले होते.

पोलिश जनता आणि भारतीयांमधील दिर्घ मैत्री म्हणून स्मारकाची निर्मिती झाली. त्याला असोसिएशन ऑफ पोल्स इन इंडियाद्वारे बनवण्यात आले. त्याचप्रकारे वॉर्सा येथे कोल्हापूर स्मारक त्या लोकांनी बांधले ज्यांचे बालपण कोल्हापूरात गेले आहे. १९४३-१९४८ या काळात हजारो निर्वासितांनी भारतात कोल्हापूरातील वळीवडे येथे आश्रय घेतला होता. या स्मारकावर कोल्हापूर संस्थानाच्या आदरतिथ्यासाठी धन्यवाद, जगभरात पसरलेले आम्ही सर्व भारतातील या कृतज्ज्ञतेसाठी त्यांची आठवण ठेवतो असं या स्मारकावर लिहिलं आहे.

पोलिश निर्वासित जे कधीकाळी वळीवडे येथे राहत होते. त्यांचे भारतासोबत मजबूत संबंध कायम राहिले. १९५४ साली रियूनियन सुरू झाले, सतत दौरे आणि भेटीगाठीतून विकास झाला. १९९० मध्ये स्थापन झालेल्या असोसिएशन ऑफ पोल्स इन इंडिया १९४२-१९४८ मधील हा इतिहास संरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याकाळच्या निर्वासित आणि भारतीयांच्या पाहुणाचाराला चालना देण्यासाठी मदत करत आहे.

वळीवडे येथील पोलिश निर्वासितांनी अनेकदा भारतात दौरे केले आहेत. हे दौरे आणि भेटी त्यांच्या इतिहासत झालेल्या जुन्या आठवणी आणि कोल्हापूर संस्थानांकडून मिळालेले सहकार्य यासाठी कायम आठवणीत ठेवण्याचं काम या स्मारकातून होते.