लाडकी बहीण योजनेसाठी कधीपासून होती तयारी?; शिंदेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, योजनेचा दुसरा फायदाही सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:23 PM2024-08-12T19:23:54+5:302024-08-12T19:31:57+5:30

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यासाठी राज्यभरात महिला वर्गाची लगबग सुरू असताना राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या योजनेबाबतची सरकारची भूमिका ठामपणे मांडली आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ व ‘अन्नपूर्णा योजना’ या सर्वसामान्य महिलांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचा दावा मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.

शासन राज्याच्या विकासाला प्राधान्य देत असतानाच कल्याणकारी योजनाही राबवित असून यातून विकास व कल्याण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मांडलं. ते ‘मुंबई तक बैठक’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे शासन आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना याबरोबरच वयोश्री योजना, तीर्थक्षेत्र योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची तयारी ही गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू होती. घरातील महिलांना घरखर्च करताना कसरत करावी लागते. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य शासन करत आहोत.

"ही योजना सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ‘लेक लाडकी लखपती योजना’ तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क माफी अशा योजनेतून महिलांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. या कल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद करूनच त्याची अंमलबजावणी केली जात आहे," असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र हे राज्य प्रगतीशील राज्य असून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होत असून रोजगार संधी निर्माण होत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.