60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:02 PM2024-07-04T19:02:24+5:302024-07-04T19:06:11+5:30

1971 च्या युद्धात याच विमानाने पाकिस्तानला धूळ चारली होती.

शीतयुद्धाच्या काळापासून भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या MiG-21 लढाऊ विमानाला 2025 मध्ये वायुसेनेतून हटवण्यात येणार आहे. फ्लाइंग कॉफिन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या लढाऊ विमानाने 1971 च्या युद्धात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. या विमानाला का काढले जात आहे? जाणून घ्या...

आपल्या 60 वर्षांच्या काळात या विमानाने 200 पायलट आणि 60 नागरिकांचा जीव घेतला आहे. तांत्रिक कारणांमुळे या विमानाचा अनेकदा अपघात झाला आहे. 1966 ते 1984 दरम्यान भारताकडे 840 मिग-21 लढाऊ विमाने होती, यातील अर्धी कोसळली.

28 जुलै 2022 रोजी राजस्थानमध्ये मिग-21 क्रॅश झाल्याने दोन पायलट शहीद झाले होते. 8 मे 2023 रोजी तांत्रिक बिघाडामुळे पायलटला विमानातून इजेक्ट व्हावे लागले होते. पायलटचा जीव वाचला, पण विमान कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, 2010 पासून आतापर्यंत 20 हून अधिक मिग-21 विमाने कोसळली आहेत.

सध्या हवाई दलात ही विमाने चालवणारी फक्त तीन पथके उरली आहेत, जी पुढील वर्षी निवृत्त होतील. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 20 लढाऊ विमाने आहेत. या लढाऊ विमानाने अनेकदा हवाई दलाने पाकिस्तानला मात दिली आहे. विशेष म्हणजे, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनीदेखील याच विमानाने PAK चे F-16 लढाऊ विमान पाडले होते. राहिले.

हे विमान उडवण्यासाठी फक्त एका पायलटची गरज असते. 48.3 फूट लांबीच्या विमानाची उंची 13.5 फूट असून, हे ताशी 2175 किमी वेगाने उडण्यास सक्षम आहे. याची कमाल रेंज 660 किमी आहे, तर फक्त 8.30 मिनिटांत 57,400 फूट उंची गाठू शकतो.

हे 23 मिमीच्या तोफांनी सुसज्ज असून, प्रति मिनिट 200 राउंड फायर करू शकतो. यात चार रॉकेटदेखील बसवता येतात. याव्यतिरिक्त, तीन प्रकारचे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. याशिवाय 500 किलो वजनाचे दोन बॉम्ब लावले जाऊ शकतात. सध्या हवाई दलात मिग-21 ऐवजी तेजस फायटर जेट घेतले जात आहेत.