भाजपची ओळखच बदलणार; मोदी-शहांची नवी रणनीती तयार, लवकरच राजकीय धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 12:10 PM2021-08-22T12:10:11+5:302021-08-22T12:16:33+5:30

उत्तर प्रदेशसह ५ राज्यांत भाजपची नवी रणनीती

हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी वेगळीच रणनीती आखली आहे. विरोधकांना धक्का देण्यासाठी भाजपनं आता अल्पसंख्यांक समाजाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे दिवंगत नेते सिकंदर बख्त यांची २४ ऑगस्टला जयंती आहे. त्या दिवशी भाजपकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मुस्लिमांना भाजपला जोडण्यासाठी पक्षानं विशेष रणनीती आखली आहे.

उत्तर प्रदेशसह निवडणूक असलेल्या ५ राज्यांसाठी भाजप नेतृत्त्वानं विशेष व्यूहनीती आखली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ हजार मुस्लिम मतदारांना भाजपकडे वळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे पक्षावर बरीच टीका झाली होती. मात्र पक्षानं ३०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता मिळवली. यावेळी मात्र पक्ष मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे.

उत्तर प्रदेशात ज्या विधानसभा मतदारसंघात ७० ते ८० टक्के किंवा याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत, तिथे मुस्लिम समाजातील मजबूत उमेदवार दिला जाईल, असं भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींनी सांगितलं.

मुस्लिमबहुत मतदारसंघातील मजबूत उमेदवार शोधून त्यांनी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले जातील. त्यांच्या विजयासाठी पक्ष आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल, असंदेखील सिद्दीकी म्हणाले.

मुस्लिम मतदारांची संख्या कमी असलेल्या, पण त्यांची एकगठ्ठा मतं एका पक्षाला गेल्यास निवडणूक निकाल फिरवू शकत असलेल्या भागात भाजपनं वेगळी रणनीती आखली आहे. या ठिकाणी भाजप किमान ५ हजार मुस्लिम मतं स्वत:कडे फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे.

मुस्लिम मतदारांना भाजपजवळ आणण्यासाठी पक्षानं तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. यंदा मात्र भाजपनं वेगळी रणनीती आखली आहे.

गेल्या निवडणुकीत पक्षाकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता असणारे मुस्लिम चेहरे नव्हते. मात्र यंदा अनेक मुस्लिम उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांची यादीच पक्षानं तयार केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं ९ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली. त्यातले ३ जण दुसऱ्या क्रमाकांवर राहिले. याशिवाय पक्षानं आसाममध्ये ८, तमिळनाडू २, केरळमध्ये १२ अल्पसंख्याकांना संधी दिली होती. आता उत्त प्रदेशह पाच राज्यांमध्येही भाजप अल्पसंख्याकांना तिकिटं देणार आहे.