CoronaVirus Live Updates : फक्त एक महिना आणखी मग कोरोना कायमचा संपण्याची शक्यता; जाणून घ्या, एंडेमिक फेज म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:45 PM2022-02-17T12:45:26+5:302022-02-17T13:12:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,757 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 541 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,757 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 541 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटची आलेली तिसरी लाट ओसरत आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि दुकानेही पूर्वीप्रमाणेच सुरू होत आहेत. पण, व्हायरस अद्यापही कायम आहे.

कोरोना महामारी आता एंडेमिक टप्प्यात पोहोचली आहे (Has Covid turned endemic) का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असे असल्यास आणखी एक समस्या आहे. पण कोविडवरील तज्ज्ञांची यावर वेगवेगळी मतं आहेत.

एंडेमिक ही (Covid Endemic Stage) एक शास्त्रीय संज्ञा आहे. कोणतीही महामारी किंवा संसर्ग कायमचा संपणार नाही. म्हणजेच आता आपल्याला त्याच्यासोबत राहावे लागले, असा याचा अर्थ आहे.

कोरोना महामारी अखेरच्या टप्पात किंवा संपल्याची चर्चा होत आहे. आता महामारी एंडेमिक टप्प्यात पोहोचली आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचवेळी या टप्प्यातील बदलासाठी आणखी एक ते तीन महिने लागू शकतात, असे आणखी काही तज्ज्ञ सांगत आहेत.

ICMR मधील प्रमुख (एपिडेमियोलॉजी विभाग) डॉ. समीरन पांडा यांनी कोरोनाला जेमतेम दोन वर्षे झाली आहेत. अजूनही त्याच्या पॅटर्नचा अभ्यास सुरू आहे, असं म्हटलं आहे. याउलट अलिकडेच ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग यांनी वेगळे मत मांडले आहे.

कोरोना व्हायरसचे एंडेमिकमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे लोकांना त्यासोबतच जगावे लागेल, असे कांग म्हणाले होते. थोड्याच वेळात भारतातील कोरोना महामारी एंडेमिक टप्प्यात पोहोचू शकते. देशात करोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली होती.

ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य होती. दुसरी लाट डेल्टा व्हेरियंटमुळे आली होती, असे काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

एखादी महामारी एंडेमिक टप्प्यात पोहोचली म्हणजे ती पूर्णपणे संपण्याची शक्यता नाही. अशा प्रकारे लोकांना तिच्यासोबत कायमचे राहावे लागेल. महामारीच्या विपरीत या टप्प्यात म्हणजे एंडेमिकमध्ये सर्व लोकांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

आपण एंडेमिक टप्प्यात पोहोचलो आहोत, हे सांगणे खूप घाईचे आहे. हर्ड इम्युनिटी आणि एन्डेमिसिटी यासारख्या संज्ञा चांगल्या आहेत, पण आपण पुराव्यांच्या आधारावर पुढे जावे. सध्या जगभरात तिसरी लाट थंडावत आहे, असे कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले.

"पुढील दोन ते चार आठवड्यांत कोरोना महामारी खालच्या पातळीवर पोहोचेल. हा काळ तीन गोष्टींचा अभ्यास करण्याचा असेल. नैसर्गिक संसर्ग आणि कोरोना लस यांच्यापासून किती प्रमाणात प्रतिकारशक्ती प्राप्त झाली."

येत्या दोन ते सहा आठवड्यांत देशात कोरोनाचा कोणता व्हेरियंट अधिक प्रभावी आहे, हे पाहावे लागेल. कुठला हॉटस्पॉट समोर येईल की नाही, हे देखील पाहणे बाकी आहे, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रुग्णांची संख्या आणि मृत्युंच्या संख्येवर आधारित या संसर्गाला महामारी घोषित केली होती. आता एंडेमिक आणि एपिडेमिक घोषित करणे हे वेगवेगळ्या देशांवर अवलंबून आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटची लाट थंडावली आहे. ही लाट पुन्हा वेग घेईल का? या शक्यतेची डॉक्टर वाट पाहतील. पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असे समीरन पांडा म्हणाले आहेत.

कोरोना व्हायरस स्वरुप बदलत राहील. तो अधिक धोकादायक व्हेरिएंटमध्ये बदलेल तेव्हा समस्या वाढेल. तसे झाले नाही तर महामारी मर्यादित क्षेत्रातच राहील, असे एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.