CoronaVirus Live Updates : बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:00 PM2022-09-06T13:00:20+5:302022-09-06T13:25:13+5:30

CoronaVirus Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. लाखो लोकांनी आपला जीव गमावला असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.

जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येऊ शकतो अशी धडकी भरवणारी भविष्यवाणी तज्ज्ञांनी केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) कडून असे सांगण्यात आले आहे की, युरोपीय देशांमध्ये या हिवाळ्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर येऊ शकतो.

आरोग्य तज्ञांनी सरकारला अशा केसेस वाढण्यापूर्वी थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अलीकडेच, चीनमधील एका शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्य तज्ञ आणि राष्ट्रीय IMA कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष, डॉ राजीव जयदेवन म्हणाले की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट हिवाळ्यात येईल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही, कोणता प्रकार इतका धोकादायक असेल काहीही सांगता येत नाही. आतापर्यंत 6 व्हेरिएंट आली आणि गेली.

कोरोनाची लस आवश्यक आहे कारण त्यामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. हे संक्रमणापासून अधिक संरक्षण देखील प्रदान करतात असंही डॉ राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे.

सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ जुगल किशोर म्हणतात की, केस वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. नवीन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे कुठेही आणि कधीही शक्य आहे. जेव्हा लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते तेव्हा देखील असे होऊ शकते. गर्दीत कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळेही कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,417 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 5,28,030 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अनेक राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे अजूनही भारतासह अनेक देशांमध्ये लोकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

युरोपातील हिवाळ्याची भारताशी तुलना होऊ शकत नाही. तिथे केसेस झपाट्याने वाढल्या तर भारतातही असेच होईल असे नाही. दोन्ही ठिकाणांची वाढ सारखी असू शकत नाही. ते भारतातील राज्यांनुसार देखील भिन्न असू शकते. उत्तर भारतात थंडी जास्त असते असं आयसीएमआरच्या डॉ. ललित कांत यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे चीनमधील एका शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनच्या चेंगदू शहरात कोरोनाच्या प्रकरणांमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे दोन कोटींहून अधिक लोकांना घरातच राहावे लागले आहे. जवळपास 70 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.