रशिया- युक्रेनच्या युद्धाचं भारतावरही संकट; शेअर बाजारासह, शस्त्र, इंधनावरही होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:29 PM2022-02-21T15:29:58+5:302022-02-21T15:43:47+5:30

रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनमधील परिस्थिती बिघडतच चाचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सरकारी लष्कर आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.

रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. रशियाने हल्ला केल्यास युक्रेनच्या बाजूने उतरणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्याशिवाय रशियाविरोधात काही युरोपीयन देशही उतरण्याची शक्यता आहे. तसेच रशिया युक्रेन युद्ध पेटल्यास भारतावरही याचा परिणाम होणार आहे.

UNSC बैठकीत भारताने मिन्स्क करार आणि नॉर्मंडी फॉर्मेट अंतर्गत वाटाघाटी सुरू करण्यास समर्थन दिले. भारतीय राजदूत म्हणाले, आमचा विश्वास आहे की मिन्स्क करार पूर्व युक्रेनवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक संवादासाठी आधार प्रदान करतो. सर्व बाजूंनी परस्पर मतभेद दूर ठेवून संवादाद्वारे सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं भारताने म्हटलं आहे.

युद्धाच्या सावटामुळे जगातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे.

रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति बॅरल 100 डॉलर इतका उच्चांक दर ही गाठला आहे. सध्या प्रति बॅरल 93 डॉलर असा दर सुरू आहे. प्रत्यक्षात युद्ध पेटल्यास कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने देशात इंधन दरवाढ आणि पर्यायाने महागाईमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतीय लष्करात जवळपास 60 टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्याशिवाय रशियाकडून एस-400 ही क्षेपणास्त्रविरोधी एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. युद्ध पेटल्यास रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

युद्ध झाल्यास रशिया चीनकडे मदत मागू शकतो. ही स्थिती भारतासाठी भविष्यात चिंताजनक होऊ शकते. रशिया-चीन मैत्रीमुळे भारत-चीन सीमा प्रश्नात नवा वाद होऊ शकतो. रशिया हा भारताचा जुना मित्र असून अनेक कठीण काळात रशियाने भारताला मदत केली आहे.