Indian Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! टेंशन फ्री प्रवासासाठी रेल्वेने सुरू केली 'विशेष' सुविधा, जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 03:21 PM2022-02-20T15:21:09+5:302022-02-20T15:26:40+5:30

प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवण्यासाठी रेल्वेने 'ऑपरेशन अमानत' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

नवी दिल्ली: रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी मानली जाते. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी नवनवीन उपक्रम राबवत असते.

परंतु, प्रवासादरम्यान अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा प्रवासी त्यांचे सामान ट्रेनमध्येच विसरतात किंवा त्यांचे सामान चोरीला जाते.

तुमच्यासमोर अशी परिस्थिती उद्भवली असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुमचे सामान परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिस तुम्हाला मदत करू शकतात. रेल्वे पोलीस दल प्रवाशाचे ते सामान आपल्या ताब्यात घेते आणि सुरक्षित ठिकाणी ठेवते.

प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवण्यासाठी रेल्वेने 'ऑपरेशन अमानत' नावाचा उपक्रम सुरू केला आहे. पूर्वी रेल्वेत विसरलेली किंवा चोरी गेलीली वस्तू सापडल्यास रेल्वे गोदामात ठेवली जात असे.

आता हरवलेल्या मालाचा फोटो काढून रेल्वे पोलीस तो फोटो रेल्वे झोनच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर करणार आहेत. येथे जाऊन तुम्ही तो फोटो पाहून तुमचा माल ओळखू शकता.

यानंतर प्रवाशांनी रेल्वे बोर्डाशी संपर्क साधल्यानंतर सामानाची पडताळणी करुन तुमचे सामान परत केले जाते. अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीय रेल्वेने सांगितले की, 2021 मध्ये या मिशन अमानतच्या मदतीने 23 कोटी रुपयांचा माल परत करण्यात आला आहे. सुमारे 12,377 प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

रेल्वे स्थानकावर तुमचे कोणतेही सामान मागे राहिल्यास त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता.

येथे तुम्हाला Passenger and Freight Services या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या सामानाचा तपशील आणि संपर्क क्रमांक मिळेल.