5 नोव्हेंबरपासून वंदे भारत ट्रेनच्या वेळा बदलणार; जाणून घ्या, नवीन वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 03:00 PM2022-11-03T15:00:16+5:302022-11-03T15:06:10+5:30

Vande Bharat Superfast Express Train : मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत रेल्वेकडून बदल करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 5 नोव्हेंबर 2022 पासून वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत रेल्वेकडून बदल करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ट्रेन नंबर 20901 मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस वापी स्थानकावर 8.0 वाजता पोहोचेल, तर तेथून ती 8.02 वाजता सुटणार आहे.

यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस वापी स्थानकावर 8.04 ला पोहोचत होती आणि 8.06 वाजता रवाना होत होती. याशिवाय, सुरत स्थानकावर 09.00 वाजता पोहोचून 09.03 वाजता स्थानकावरून रवानाऐवजी 08.55 आणि 08.58 वाजता रवाना होईल.

त्याचप्रमाणे, परतीच्या मार्गावर ट्रेन नंबर 20902 गांधीनगर कॅपिटल ते मुंबई सेंट्रल वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस बडोदा येथे 15.53 वाजता पोहोचेल आणि 15.56 वाजता रवाना होईल. आधी ही ट्रेन 15.50 वाजता बडोदा स्थानकावर येत होती आणि 15.55 वाजता रवाना होत होती.

तर वापी स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 18.38 ऐवजी 18.13 वाजता पोहोचेल आणि 18.40 ऐवजी 18.15 वाजता रवाना होईल. या मार्गावरील वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन उर्वरित स्थानकांवर वेळापत्रकानुसार धावेल. दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत 20 मिनिटांनी बदल करण्यात आला आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दरम्यान, वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी जनावरांना धडकल्याची बातमी आली होती. वंदे भारतचे या मार्गावर महिनाभरात तीनवेळा जनावरे आदळून नुकसान झाले आहे.

पहिली घटना 6 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या धडकेची होती. दुसरी घटना 7 ऑक्टोबर आणि तिसरी घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली.