नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 12:35 PM2022-01-01T12:35:26+5:302022-01-01T12:42:55+5:30

Space missions : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम हाती घेणार आहे.

नवीन वर्षात भारतीय अंतराळ क्षेत्रात अनेक घडामोडी घडणार आहेत. कोरोना साथीमुळे रखडलेल्या अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार आहे. नवी अवकाश भरारी भारत घेणार आहे.

स्वदेशात निर्माण केलेल्या अवकाशयानातून अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचा गगनयान मोहिमेचा उद्देश आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात गगनयान अवकाशा झेपावेल.

तत्पूर्वी इस्रो क्रू एस्केप सिस्टीम परफॉर्मन्सच्या चाचणीसाठी एक प्रायोगिक अवकाशवाहन अंतराळात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेला ‘आदित्य एल१’ असे नाव देण्यात आले आहे. यंदा ही मोहीम फत्ते करण्याचा इस्रोचा निर्धार आहे.

गेल्या वर्षीच ही मोहीम सुरू होणार होती. मात्र, कोरोनामुळे त्यात वर्षभराचा खंड पडला. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर असलेल्या सूर्यमालेच्या कक्षेत इस्रोकडून यान प्रक्षेपित केले जाईल.

पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडण्यासाठी स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकलची (एसएसएलव्ही) निर्मिती इस्रो करत आहे. या एसएसएलव्हीची पहिली चाचणी नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केली जाणार आहे. ५०० किलो वजनाचे तसेच ५०० किमी अंतरापर्यंत उपग्रह स्थिर करण्याची क्षमता या एसएसएलव्हीमध्ये आहे.

यंदा जुलै महिन्यात चांद्रयान-३ अवकाशात झेपावणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे या मोहिमेला एक वर्षाचा उशीर झाला आहे.  २००८ मध्ये चांद्रयान मोहिमेला सुरुवात झाली असून यंदा मोहिमेचा तिसरा टप्पा आहे.

चांद्रभूमीचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-२ चंद्राच्या अलीकडेच कोसळल्याने या मोहिमेला धक्का बसला होता. त्यानंतर दोन वर्षांनी चांद्रयान-३ मोहीम पुढे नेणार आहे.